नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू करणे अत्यावश्यक बनल्याची भूमिका मांडली आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारकडे रणनीतीचा अभाव आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
देशातील करोना संकटाच्या हाताळणीवरून कॉंग्रेसकडून सातत्याने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामध्ये अग्रभागी असणाऱ्या राहुल यांनी मंगळवारी ट्विटरवरून पुन्हा सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचे सरकारच्या ध्यानात येत नाही. सरकारच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे, असे त्यांनी म्हटले. लॉकडाऊन लागू करताना गरीब, गरजूंना किमान उत्पन्नाची हमी देणाऱ्या योजनेचे (न्याय) संरक्षण मिळावे, अशी मागणीही राहुल यांनी केली. कॉंग्रेसची संकल्पना असलेल्या न्याय योजनेचा राहुल यांच्याकडून सातत्याने आग्रह धरला जात आहे. त्या योजनेंतर्गत गरीब, गरजूंना थेट आर्थिक मदत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.