क्विन्सलॅंड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघादरम्यानचा एकमेव दिवसरात्र कसोटी सामना रविवारी अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात पहिल्या डावात दमदार शतकी खेळी करणारी भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना सामन्याची मानकरी ठरली.
संततधार पावसाने पहिल्या दिवसापासून या सामन्यात व्यत्यय आणला होता. या कसोटीत भारताने पहिल्या डावात आठ गडी गमावून 377 धावा करत डाव घोषित केला होता. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 9 गडी गमावून 241 धावा करत आपलाही पहिला डाव घोषित केला. भारताने दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 135 धावा केल्या आणि दुसरा डावही घोषित केला व ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 272 धावांचे आव्हान ठेवले. सामन्याच्या रविवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात 2 बाद 36 अशी स्थिती बनली होती. त्यावेळी सामन्याचा निकाल लागणार नाही हे लक्षात आल्यावर दोन्ही संघांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
भारताकडून दुसऱ्या डावात शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि पहिल्या डावात 127 धावांची अफलातून शतकी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनाने 31 धावांची खेळी केली. शेफालीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक फटकावले. शेफालीचे कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावातील हे केवळ तिसरेच अर्धशतक ठरले आहे. मानधना व शेफाली यांनी 70 धावांची सलामी दिली. मानधना 31 धावांवर बाद झाली. त्यानंतर शेफाली देखील परतली. त्यानंतर पूनम राऊतने संघाला अडीचशे धावांपेक्षा जास्त आघाडी मिळवून दिली. त्याचवेळी भारताची कर्णधार मिताली राजने डाव घोषित केला व विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 272 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते.
मात्र, रविवारी भारताच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवूनही नंतर त्यांच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयश आले. अखेर हा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग 17 धावांवर नाबाद राहिली. बेथ मुनीने 11 आणि एलिसा हिलीने 6 धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामी व पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 145 षटकांत 8 बाद 377 घोषित. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 96.4 षटकांत 9 बाद 241 घोषित. भारत दुसरा डाव – 37 षटकांत 3 बाद 135 घोषित. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 15 षटकांत 2 बाद 36 धावा. (मेग लेनिंग नाबाद 17, झुलन गोस्वामी 1-8, पूजा वस्त्रकार 1-13).