केंदू – करंदी (ता. शिरूर) येथील परिसरात कांदा लावगडीला वेग आला आहे. शिवारात कांदा लागवडीची धांदल उडाली आहे. कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळेल, या आशेवर सर्वत्र कांदा लागवडीला गती मिळाली असल्याचे चित्र शिरूर तालुक्यात सुरू आहे.
शिरूर तालुक्यात यावर्षी परतीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कांदा लागवडीची आस लागली आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे कांद्याची लागवड थोडी झाली होती. कांद्याची जी लागवड झाली ती पाण्याअभावी करपून गेली होती. त्यात बाजारभाव ढासळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. मात्र, यावर्षी चांगला बाजारभाव या आशेवर कांदा लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कांदा लागवडीला वेग आला आहे. लागवडीसाठी शिवार गजबजली आहेत.
किमान उत्पादन खर्च मिळावा, या आशेवर शेतकरी कांदा पिकाला प्राधान्य देत असतात. मात्र, गेल्यावर्षी एक क्विंटलला तीनशे रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. साधा उत्पादन खर्च मिळालेला नव्हता. यावर्षी फेब्रुवारीत कांद्याचा भाव हा प्रति क्विंटल पाचशे रुपयांपर्यंत पोहचला होता. निर्यात बंदी घातल्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी एकावन्न ते बावन्न रुपये असलेला बाजार आज बत्तीस ते पस्तीस रुपयांवर येऊन ठेपला होता.
सध्या कांद्याचा बाजारभाव प्रति किलो सतरा रुपयांवर आला आहे. जुने साठवलेला कांदा बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक बाजारात वाढली आहे. मात्र, व्यापारी नवीन कांद्याला पसंती देत नाहीत. त्यामुळे बाजारभाव पडल्याची चर्चा सुरू आहे.