जुने वर्ष सरले. आपण नव्या वर्षात पदार्पण केले. भिंतीवरच्या कॅलेंडरवरचे आणखी एक पान संपले. 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस. त्यामुळे नव्या वर्षाच्या कॅलेंडरची तजवीज अगोदरच झालेली. आपल्या नव्या कोरेपणासह ते नवे कॅलेंडर भिंतीवर विराजमान होते. जुने काही तासांतच अडगळीत टाकले जाते.
खरेतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वर्ष सरले असते. त्या वर्षात बऱ्याच घटना घडलेल्या असतात. त्यातल्या काही धक्का देणाऱ्या असतात, काही हादरवणाऱ्या. काही चटका लावणाऱ्या तर काही वेदनांवर हळूवार फुंकर घालणाऱ्या. काही उमेद जागवणाऱ्या तर काही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणाऱ्या. मात्र क्षण जसा जातो तसे त्यांचे रूपांतर आठवणींत होते. त्या त्रासदायक असल्या तरी विस्मृतीत जात नाहीत. जाऊ दिल्या जात नाहीत. फक्त त्यांचे स्मरण करण्याचे शक्यतो टाळले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने काही चांगले आणि काही वाईट त्या 365 दिवसांत आणि त्यात येणाऱ्या अगणित क्षणांत घडलेले असते.
प्रत्येकाचे दु:खाचे आणि आनंदाचे क्षण वेगवेगळे असतात. त्यांची वेदना आणि दाहकता किंवा त्यांचा आनंद आणि त्यामुळे येणारी प्रसन्नता वेगवेगळी असते. फक्त आपण कोणत्या स्थानावर उभे आहोत व त्याचे आकलन कसे करत आहोत यानुसार त्याची अनुभूती प्रत्येकाला वेगवेगळी येते. आज आपण नव्या वर्षात पदार्पण केले. मात्र मावळलेले 2020 हे वर्ष आतापर्यंतच्या सगळ्याच गृहीतकांना, ठोकताळ्यांना गुंडाळून ठेवणारे ठरले. एकच अनुभव, एकच अनिश्चितता, एकच भय आणि एकच असहायता अशा सगळ्यांची समान अनुभूती या वर्षाने प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला, गावाला, राज्याला, देशाला नव्हेच तर संपूर्ण जगाला दिली. सरलेल्या वर्षाचे सार काय होते, असा प्रश्न कोणालाही विचारला तर चटकन त्याचे उत्तर करोनाशी संबंधित येईल. करोनाने सगळ्यांना पार गारठून टाकले.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कोणाला ज्याचा मागमूसही नव्हता असा हा विषाणू अचानक प्रकट झाला. सर्वशक्तीमान झाला. मी मी म्हणवणाऱ्या व्यक्तींना आणि सत्तांना त्याने गलितगात्र केले. त्याने कोणताही भेद केला नाही. त्याच्या समोर राजा आणि प्रजा, संपन्न आणि गरीब अशी सर्व राष्ट्रे आणि त्यातील व्यक्तीसमूह समान होते. त्याने कोणालाच उसंत दिली नाही. दिवाळीच्या म्हणजे भारतातील दिवाळीच्या सुमारास करोनाचा तळपता सूर्य काहीसा मंद झाला. त्याचा हल्ला क्षीण झाला. त्याचा उपद्रव कमी होत गेला. त्यामुळे ज्यांच्यावर त्याने आक्रमण केले होते, त्यांची प्रतिकारशक्ती वाढत गेली. प्रत्येकालाच करोनाच्या हल्ल्याचा व्यक्तीगत स्तरावर प्रतिकार करावा लागला. अनेकांनी विजय मिळवला. त्याला परतवून लावले. काही कमी नशिबवान होते. त्यांना अकाली मृत्यूने कवटाळले. आपल्या कुटुंबीयांसमवेत घालवलेल्या असंख्य सुखद आठवणी मागे ठेवून ते निघून गेले. हताशेचे ढग सगळीकडे दाटले असताना आणि आता स्थिती पूर्वपदावर येतेय असे वाटत असतानाच त्या करोनाने नवा अवतार धारण केल्याच्याही बातम्या आहेत. पण राक्षस कुळ एकच. त्याचा तोड काढला गेला आहे. ती जमेची बाजू.
निर्मात्याने सृष्टीची रचना केली. त्यात सगळ्यांत अद्भुत रचना आहे ती माणूस. या माणसाला त्याने हातचे काहीच न राखता सगळेच दिले. त्याला सगळे अवयव दिले. त्या अवयवांकडून काय काम करवून घ्यायचे याचा प्रोग्रॅम फिड करून ठेवलेले डोके दिले. त्याच्याच बळावर हा मानव आज इतकी वर्षे तगून आहे. संकटे आलीत, प्रलय आले, छोट्या लढाया झाल्यात, महायुद्धे झाली. करोनाच्या अगोदर स्पॅनीश फ्लू, प्लेग, स्वाइन फ्लू सारखे महाभयंकर आजार आले. निरोगी आणि सर्वच वयोगटातील माणसे त्यात मरण पावली. पण मानवाने हार मानली नाही. त्याने कधीच गुडघे टेकले नाहीत. त्याने लढा दिला, प्रतिकार केला. आपल्याला दिलेल्या गुणवैशिष्ट्याचा वापर करत संघर्ष केला अन् जिद्दीने संकटांवर मात केली. करोनाच्या संकटावरही मात तो करणार आहे. किंबहुना विजय त्याच्या दृष्टीपथात आला आहे. त्यातून तो सावरणार आहे. मात्र हे सावरणे म्हणावे तेवढे सोपे नसणार आहे. कारण समोर आव्हाने फार मोठी आहेत. व्यक्तीचा, कुटुंबाचा, देशाचा आणि एकूणच जगाचा जमा खर्च यांचा ताळमेळ बसवायचा आहे. त्या दिशेने आता प्रवास करावा लागणार आहे. नवा दिवस आणि नवे वर्ष एक उमेद आणि आशेचे किरण सोबत घेऊन येत असते.
आज मला कंटाळा आला असे सूर्य कधी म्हणत नाही. तो रोज न चुकता त्याच्या वेळेवरच येतो अन् जातो. कोणी गजर लावून त्याला उठवत नाही की तो उद्या येणार की नाही याबाबत कोणाच्या मनात शंकाही डोकावत नाही. वर्षानुवर्षे तो त्याचे कार्य करत आला आहे. त्याच्या या गुणाचा आणि वैशिष्ट्याचा स्वीकार करावा लागणार आहे. करोनाच्या लढाईतही आपल्यातल्या काही जणांनी घरात सुरक्षितता न शोधता मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष रणांगणावर उतरून लढा दिला. त्यांना “करोना योद्धा’ म्हणून गौरवले गेले. संशोधकांनी करोनाचे मूळ आणि कुळ शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर अंतिम प्रहार करण्याची तयारी चालवली. त्यात ते यशस्वी झाले आहे. त्यामुळेच विजयाच्या उंबरठ्यावर असताना आता सरत्या वर्षातील कटू अनुभव उगाळत बसणे परवडणारे नाही. पण त्या वर्षात आव्हानांचा जो मोठा डोंगर उभा राहीला आहे त्याच्या बंदोबस्ताची तयारी करावी लागणार आहे. करोनानंतरचे जग बदलले आहे. सवयी बदलायला त्याने भाग पाडले आहे.
जी गोष्ट आपण वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने करत होतो ती वेगळ्या पद्धतीनेही करता येऊ शकते याची एक झलक 2020 ने दिली आहे. ज्या अनावश्यक गोष्टी आपण कवटाळून बसलो होतो किंवा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या त्यांच्यातला फोलपणा त्या वर्षाने उलगडून दाखवला आहे. हल्ली सगळीकडेच ऐकायला मिळते. 2020 आम्ही आमच्या स्मृतीपटलावरून डिलिट करतो आहोत. पण आपण म्हणजे संगणक नाही किंवा 2020 म्हणजे कोणीतरी तयार करून टाकलेला प्रोग्रॅमही नाही. त्या वर्षाने नक्कीच त्रास दिला. पण अशा त्रासातून उभारी घेता येऊ शकते याचा धडाही दिला, विश्वासही जागवला.
नव्या वर्षात पदार्पण करताना हाच विश्वास, संकटावर मात करण्याची निर्माण झालेली जिद्द आणि भविष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याची मिळालेली शिकवण ही फार मोठी शिदोरी आहे. याच्या बळावर पुढची अनेक शतके आणि सहस्त्रके मानव त्याचा लढा लढू शकतो, वादळे झेलू शकतो आणि संघर्षात विजयही प्राप्त करू शकतो. केवळ आत्मविश्वास तेवढा जागवला पाहिजे.