आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांची माहिती : पुराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
पुणे – आंबिल ओढ्याला आलेल्या मागील वर्षीच्या 25 सप्टेंबरच्या पुराच्या अनुभवातून महापालिकेने अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ओढ्यावरील काही जुने आणि कमी उंचीचे कल्व्हर्ट काढून टाकण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी सांगितले.
जुन्या आणि कमी उंचीच्या कल्व्हर्टमुळे वाहून आलेला गाळ साचून राहतो आणि त्याठिकाणी फुगवटा निर्माण होऊन आजूबाजूच्या परिसरात पाणी साठते. मूळ ओढ्याचे पात्रच अतिक्रमणाने बदलण्यात आल्याने अनेक ठिकाणी नाले रुंद झाले आहेत. त्यातून पूर्वी त्या वेळच्या ओढ्यांच्या स्थितीप्रमाणे कल्व्हर्ट बांधण्यात आले आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीत हे कल्व्हर्ट कमी उंचीचे ठरत असल्याने ते काढून टाकण्यात येणार आहे. याशिवाय जेथे कल्व्हर्टची उंची वाढवणे आवश्यक वाटते तेथे तेथे ते कामही करण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.
अरण्येश्वर मंदिराशेजारच्या कल्व्हर्टचेही काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे अरण्येश्वर मंदिरासमोरच्या रस्त्यावरून साधारण अडीच ते तीन फूट उंचीवरून पाणी वाहात होते. येथील काही बंगल्यांमध्ये यावर्षीही पाणी शिरले. तसेच रस्त्यावर कचरा आणि गाळ वाहून आला. येथील कल्व्हर्टची उंची कमी असल्याने कचरा अडकल्यानंतर पाणी पुलावरून तसेच मंदिराच्या आवारातून वाहते. त्यामुळे त्याची उंची वाढवण्याचे तसेच ट्रेझर पार्क ते अरण्येश्वर मंदिरा दरम्यानच्या भागातील वहन क्षमतेला अडथळा ठरणारा कल्व्हर्ट काढून टाकण्यात येणार आहे.
याशिवाय या ठिकाणी असलेल्या फुलपाखरू उद्यानाच्या लगतचा भराव ओढ्यात आल्यानेही ओढ्याची रुंदी कमी झाली आहे. हा भरावही काढून टाकण्यात येणार आहे. परंतू याठिकाणी मोठी झाडे आहेत. त्याचे पुनर्रोपण करता येईल का, हे पाहिले जाणार आहे. तसेच अन्य पर्यायांचा विचार करून कार्यवाही केली जाणार असल्याचे डॉ. गोयल यांनी नमूद केले.