मुंबई: मागील २५ वर्षे भाजपसोबत असणाऱ्या शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट पकडली आहे. त्यामुळे ‘तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे राहिले’ या म्हणीचा प्रत्यय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत असेल, असा टोला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी शिवसेनेला लगावला आहे.
चौहान यांनी एक ट्विट केलं असून, त्यामध्ये ‘आधी छोड़ पूरी को धावे आधी मिले न पूरी पावे’ अशी हिंदीतील म्हण चौहानांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याचा अर्थ, अर्ध सोडून अख्ख्याच्या मागे धावलात, ना अर्ध मिळालं, ना अख्खं. यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा थेट उल्लेख नसला, तरी साहजिकच उद्धव ठाकरे यांना सत्तासमीकरणं जुळवताना येत असलेल्या अडचणींवर हे भाष्य आहे.
“आधी छोड़ पूरी को धावे आधी मिले न पूरी पावे!”
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 13, 2019
दरम्यान महाराष्ट्रात कुठलाच पक्ष सत्ता स्थापनेस असमर्थ ठरल्याने राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परंतु राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचं सांगत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.