माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षा कालावधीत परीक्षेशी संबंधित नसलेल्या संस्थांच्या व्यक्तींनी परीक्षा केंद्रांवर फिरकून अडचणी निर्माण करू नयेत, अन्यथा केंद्र संचालकांवरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी दिले आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती 18 मार्चला संपणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा चांगल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सतत बैठका व इतर कोणत्या ना कोणत्या कारणांनी येतच असतात. मात्र, आता परीक्षांच्या कालावधीतही हे पदाधिकारी परीक्षा केंद्रांवर फिरकत असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यामुळे परीक्षांच्या कामकाजाबाबत संशय निर्माण होऊ लागले आहेत. कॉपीसारख्या गैरप्रकारांनाही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परीक्षेच्या कालावधीत नियमाप्रमाणे परीक्षेच्या कामकाजात सहभागी नसलेल्या व्यक्तींनी परीक्षा केंद्रांवर येऊच नये. अशा सूचना मुख्याध्यापक, केंद्रसंचालक यांच्यामार्फत पदाधिकाऱ्यांना वारंवार देण्यात आलेल्या आहेत. मात्र, काही पदाधिकारी या सूचनांचे गांभीर्याने पालन करीत नसल्याची बाब उघड झाली आहे. तोंडी सूचना देऊन ऐकत नसल्याने आता थेट लेखी पत्रच काढण्यात आले आहे.
…तर मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार
परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी वगळता अन्य कोणत्याची व्यक्ती परीक्षा केंद्रांवर दिसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, असा फतवाच डॉ. गणपत मोरे यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्रसंचालकांना बजाविला आहे.