नाभिक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
जेजुरी-सध्या सर्वत्र जोरदारपणे सुरु असलेल्या तानाजी चित्रपटात नाभिक समाजाचे पात्र चुकीचे दाखविल्याने समाजबाबत चेष्टेची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे समाज बांधवांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तानाजी चित्रपटातील नाभिक समाजविषयीचा हा वगळावा अशी मागणी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे युवाध्यक्ष निलेश पांडे यांनी दिली.
हिंदवी स्वराजाच्या निर्मितीतील शिवरक्षक जिवाजी महाले, शूरवीर शिवाजी काशीद यांचे शौर्य आणि बलिदान इतिहासाला माहित आहे, नाभिक समाज हा शौर्याचे प्रतीक आहे. तानाजी या चित्रपटात नाभिक समाजाचे पात्र चुकीचे दाखविले आहे, या पात्राबाबत इतिहासात कोठे ही माहिती नाही. हे पात्र काल्पनिक दाखवून लाचार, दीन व खबरी असे चुकीचे पात्र दाखविल्याने तमाम नाभिक समाज बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रकारामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. या चित्रपटातील नाभिक समाजाच्या पात्राच्या चुकीच्या भूमिकेमुळे नाभिक समाजाच्या पिढीने कोणता बोध घ्यावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत शासनाने लक्ष घालून तानाजी चित्रपटातील हा समाजावरील अन्यायकारक भाग वगळावा, अशी मागणी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे युवाध्यक्ष निलेश पांडे, पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष महेश सांगळे यांनी सांगितले. भविष्यात ही सिनेमा, नाटक, मालिका व जाहिरातीमध्ये नाभिक समाजाविषयी व्यंग दाखवून बदनामीचा प्रकार केल्यास सेन्सॉर बोर्ड, सिनेमा, नाटक, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक कायदेशीर कारवाईला जवाबदार राहतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.