नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यात काँग्रेस २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली बाजू मजबूत करत आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर तगडे नेते उत्तर प्रदेशात आपली पूर्ण ताकद लावत आहेत. दरम्यान, काँग्रेसवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते आजही पाहायला मिळतात. अशाच एकनिष्ठ कार्यकर्त्याने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येण्यासाठी एक प्रतिज्ञा केली आहे.
पन्नास वर्षे काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार न करणारे वाराणसीनचे गुलाब सोनकरही याच कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ७० पेक्षा जास्त वय असलेले गुलाब सोनकर इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस पक्षासोबत जोडले गेलेले आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, अनेक पक्ष बनले आणि संपले, पण गुलाब सोनकर यांनी काँग्रेसचा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळेच आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसीमध्ये काँग्रेसचा आवाज बुलंद करण्यासाठी गुलाब सोनकर प्रचार करताना दिसत आहेत.
बनारस के गुलाब सोनकर पिछले 30 सालो से चप्पल नही पहनते उन्होने प्रण ले रखा है जब तक प्रदेश में कांग्रेस सरकार नही आ जाती तब तक नंगे पैर ही रहेंगे !! pic.twitter.com/RkZcjjNQJq
— UP Election 2022 (@uppolitics2022) November 28, 2021
वाराणसी येथील जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या मांडूवाडीह परिसरात राहणारे गुलाब सोनकर हा फळे आणि भाजीपाला विकण्याचे काम करत होते. पण वय वाढल्याने मुलाने त्यांना घरी राहून विश्रांती घेण्यास सांगितले. पण गुलाब यांनी जुना काँग्रेसी असल्याचे म्हणत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी ते वाराणसीच्या रस्त्यांवर प्रचार करण्यासाठी सकाळीच घरातून बाहे पडतात.
महत्त्वाची बाब म्हणजे ते अनवाणीच पक्षाच्या प्रचारासाठी जात आहेत. गुलाब यांनी प्रदेशात काँग्रेसचे सरकार येईपर्यंत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसला किमान पाच पटीने मताधिक्य वाढवावे लागेल. २०१७ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करूनही काँग्रेसला केवळ सहा टक्के मते मिळाली होती. अशा परिस्थितीत प्रियांकाला मतांची टक्केवारी सहा टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. राज्यातील संघटनेची स्थिती लक्षात घेता महिला केंद्रित अभियान असूनही ध्येय सोपे नाही.
उत्तर प्रदेशात काँग्रेस गेल्या ३२ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. १९८९ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाकडे कोणतीही व्होट बँक नाही. एकेकाळी दलित आणि मुस्लिमांची व्होटबँक काँग्रेसकडे होती मात्र आता ती ढासळली आहे. सतत सत्तेबाहेर राहिल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेतेही इतर पक्षात स्थलांतरित झाले.