5 वर्षांपूर्वी 21 टक्के असलेली संख्या आता 30 टक्क्यांवर
केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या प्रयत्नांना यश
उच्च पदावरील महिलांचे प्रमाण अजुनही 11 टक्केच
पुणे – केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे संचालक मंडळाबरोबरच कंपन्यांतील महिलांची संख्या वाढू लागली आहे. प्राप्त माहितीनुसार मोठ्या शहरांमध्ये कंपनीतील महिलांची संख्या 5 वर्षांपूर्वी 21 टक्के होती, ती आता 30 टक्क्यांवर आली आहे.
यामध्ये पुणे आणि बंगळुरूसारख्या शहरांनी बाजी मारली आहे. यासंदर्भात कंपन्यांतील महिलांच्या आकडेवारीचा अभ्यास करून जेंडर डायव्हर्सिटी हा अभ्यास अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अभ्यास अहवालानुसार कंपन्यांतील बिगर तांत्रिक जागांवरील महिलांची संख्या जास्त म्हणजे 31 टक्के आहे; तर तांत्रिक जागांवरील महिलांची संख्या 26 टक्के आहे. असे असले तरी उच्च पदावरील महिलांचे प्रमाण आणखी कमी म्हणजे 11 टक्के आहे. मध्यम पदावरील महिलांचे प्रमाण 20 टक्के तर, कनिष्ठ स्तरावरील महिलांचे प्रमाण 30 टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कंपन्यांतील संचालक मंडळावर महिलांचे प्रमाण वाढू लागले आहे.
अहवालातील माहितीनुसार, 2012 मध्ये संचालक मंडळावरील महिलांचे प्रमाण 5 टक्के होते ते आता 13 टक्क्यांवर आले आहे. देशातील विविध शहरांतील 60 कंपन्यांचा अभ्यास करून ही माहिती तयार केली आहे. केंद्र सरकारने संचालक मंडळावर 1 तरी महिलेचा समावेश असावा, अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्यामुळे हा फरक पडला असल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवालातील माहितीनुसार मोठ्या शहरांमध्ये कंपन्यांतील महिलांचे प्रमाण 31 टक्के आहे तर, मध्यम शहरांमध्ये 25 टक्के आणि छोट्या शहरांमध्ये त्यापेक्षा कमी आहे.
पुण्यातील कंपन्यांमध्ये आणखी सुधारणा करण्यास वाव
अहवालानुसार, पुण्यातील कंपन्यांमध्ये महिलांचे प्रमाण 32 टक्के आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. मोठ्या कंपन्यांतील व्यवस्थापन महिलांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असले तरी छोट्या कंपन्या मात्र याबाबत फारशी संवेदनशील असल्याचे दिसून येत नाही.