पणजी – नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. त्याचबरोबर कर संकलनाची पद्धत सुटसुटीत करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी कर विवरण सादर करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्ष संगीता सिंह यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की गेल्या वर्षी जवळ जवळ 7 कोटी 14 लाख लोकांनी कर विवरण सादर केले आहे. त्या अगोदरच्या वर्षांमध्ये ही संख्या केवळ 6 कोटी 90 लाख इतकी होती. केंद्र सरकारने करदात्यांची संख्या वाढावी याकरिता अनेक उपाययोजना केल्या आहेत.
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था विस्तारत असल्यानंतर साधारणपणे कर दात्याची संख्या वाढत असते. करोनाची साथ संपल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे भारताचा विकास दर वाढला आहे.
परिणामी कर्ज दात्यांची संख्या वाढत आहे असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर भारत सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये डिजिटल स्वरूपातील व्यवहार करण्यास चालना दिली आहे.लोकांचे डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे आपोआपच कराचे संकलन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात अर्थव्यवस्था डिजिटल करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
कर विभाग कर संकलन सोपे व्हावे याकरिता पुढाकार घेत आहे. त्याला देशातील करदाते योग्य प्रतिसाद देत आहेत. कर विभाग करदात्याशी कायम संपर्कात असतो. त्यामुळे कर विभागासंदर्भातील गैरसमजुती कमी होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे लोक आपण होऊन कर विवरण सादर करू लागले असल्याचे त्या म्हणाल्या. 2021 -22 मध्ये 14 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. त्या अगोदरच्या वर्षापेक्षा हे करसंकलन निश्चितच जास्त आहे. त्यामुळे आगामी वर्षातही कर संकलन वाढेल असे अर्थ मंत्रालयाला वाटते. कर विभागाचे अधिकारी करदात्याशी संपर्क साधत असून त्यांना नव्या नियमांची माहिती देत आहेत. त्यामुळे जनतेचा आणि कर विभागाचा संवाद वाढत चालला असल्याचे त्यांनी सांगितले.