पुणे – गतवर्षी झालेला भरमसाठ पाऊस आणि करोना पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता फारशी जाणवली नाही. आता पावसाला सुरुवात झाली, तरीही जिल्ह्यातील टॅंकरची संख्या 50 च्या आत आहे. सद्य:स्थितीत 47 टॅंकरद्वारे 42 गावे, 186 वाड्या-वस्त्यांवरील 58 हजार 715 नागरिकांनी तहान भागवली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ 12 टक्के टॅंकर सुरू करण्याची वेळ आली.
गतवर्षी जिल्ह्यात साधारण पावणेचारशे टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. त्यावेळी परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. मात्र, गतवर्षी परतीचा चांगला पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे, तलाव, शेततळे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच, करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून शहरासह जिल्हा लॉकडाऊन आहे.
हॉटेल, औद्योगीक क्षेत्रातील छोट्या-मोठ्या कंपन्या, मॉल्स यासह सर्व व्यवस्था तीन महिन्यांपासून बंद आहेत. तर लग्न सोहळेही बंद असल्यामुळे पाण्याची बचतही झाली. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यात पाणी टंचाईच्या नावाने सुरू होणारी ओरड यंदा झालीच नाही.
आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक टॅंकर
सध्या आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 15 टॅंकर सुरू आहेत. येथील 14 गाव, 40 वाडी-वस्त्यांवरील 19 हजार 711 जणांना पाणीपुरवठा होत आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यांत प्रत्येकी 10 टॅंकर सुरू असून, जुन्नरमधील 4 गाव, 40 वाड्या-वस्त्यांवरील 8 हजार 463 तर, खेडमधील 17 गाव आणि 81 वाड्या-वस्त्यांवरील 19 हजार 245 जणांना पाणीपुरवठा होत आहे. हवेली तालुक्यात 8, शिरूर आणि भोर तालुक्यांत प्रत्येकी 2 टॅंकर सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.