पिंपरी – शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. भटकी कुत्री टोळीने वावरत असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर ते धावून जातात. प्रसंगी अपघात होऊन नागरिक जखमी होतात. तसेच, सकाळी “मार्निंग वॉक’ला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून त्यांना जखमी करतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरात जागोजागी विशेषत: जिथे कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत, तिथे कुत्र्यांचा वावर जास्त आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्या जुन्या जागी सोडण्यात येते.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दोन खासगी संस्था नेमून त्यांच्यामार्फत भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. ऍन्टीरेबीज इंजेक्शन दिले जाते. तसेच, संबंधित कुत्र्यांना जिथून पकडले होते तिथे पुन्हा सोडले जाते. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मात्र सध्या वाढतेच आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवरील नसबंदीसाठी नेमलेल्या संस्था नेमक्या काय काम करतात, याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे.
कारवाईबाबत हलगर्जीपणा
शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असताना कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या संस्था नक्की काम करतात का, याविषयी संशय निर्माण होत आहे. महापालिकेचे पशुवैद्यकिय अधिकारी या कामात हलगर्जीपणा करीत आहेत. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी व ज्या संस्थांना हे काम दिले आहे, त्यांची सखोल चौकशी करावी. त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच या संस्था खोटी माहिती देत असतील अथवा दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.
महापालिका पशुवैद्यकिय विभागातर्फे गेल्या महिनाभरात 2300 कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. तेवढेच ऍन्टीरेबीज इंजेक्शन दिले आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नियुक्त संस्थांकडून विभागनिहाय नियमित कारवाई केली जात आहे.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी.