नगर – शिवभोजन योजनेअंतर्गत नगर शहरामध्ये नवीन पाच केंद्रे वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी शंभर थाळ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. तर, 26 जानेवारीला सुरू झालेल्या पाच केंद्रांपैकी एका केंद्रावर शंभर थाळ्या व दोन केंद्रांवर प्रत्येकी पन्नास थाळ्या वाढवून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या नगरला 700 थाळ्या रोज मंजूर आहेत. नव्या प्रस्तावामुळे त्या दुप्पट म्हणजेच चौदाशे होतील. राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला मंजुरी मिळताच नवीन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
नगर शहरामध्ये सध्या माळीवाडा बसस्थानक येथे कष्टाची भाकर केंद्र, जिल्हा रुग्णालयाजवळ कृष्णा भोजनालय, तारकपूर बसस्थानकासमोर अन्नछत्र, रेल्वे स्टेशनसमोर दत्त हॉटेल व मार्केट यार्ड येथे हॉटेल आवळा पॅलेस या पाच केंद्रांवर शिवभोजन योजनेअंतर्गत दहा रुपयांमध्ये थाळी देण्यात येत आहे.
आता या योजनेअंतर्गत नव्याने पाच केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रेव्हेन्यू कॅन्टीन, टीव्ही सेंटर येथील तिवारी भोजनालय, स्वस्तिक बसस्थानक येथील स्वामी समर्थ स्नॅक बार, चौपाटी कारंजा येथील बळीराजा भोजनालय व मंगल गेट येथील कोंडीमामा चौकात असणाऱ्या हॉटेल संस्कृती या केंद्रांचा समावेश आहे.
या प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी शंभर थाळ्यांना परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. याशिवाय 26 जानेवारीला सुरू झालेल्या पाच केंद्रांपैकी कष्टाची भाकर केंद्र येथील थाळ्यांची संख्या शंभरने व कृष्णा भोजनालय व अन्नछत्र येथील थाळ्यांची संख्या प्रत्येकी पन्नासने वाढवण्यात यावी, असेही प्रस्तावित करण्यात आले आहे.