गरजू व्यक्तींचा योजनेला मिळता प्रतिसाद पाहून निर्णय
दररोज 3 हजार थाळींची विक्री होणार
पुणे – गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्तदरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला गरजू व्यक्तींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवभोजन केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहे. यामुळे शासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज असलेली 1 हजार 500 थाळींची मर्यादा वाढविली असून 3 हजार थाळी केली आहे.
सध्यस्थितीत पुणे शहरात 7 ठिकाणी तर, पिंपरी-चिंचवडमधील चार केंद्रांमधून शिवभोजन दिले जाते. आता शासनाने नवीन केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरीमध्ये शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार आहे.
शिवभोजन केंद्रांवर नागरिकांना अवघ्या 10 रुपयात जेवण मिळत आहे. या केंद्रांमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण मिळत असून 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 100 ग्रॅम 1 वाटी वरण व 150 ग्रॅम भात या थाळीत समाविष्ट आहे.
सध्यस्थितीत प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान 75 व कमाल 150 थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान 75 व कमाल 200 करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता थाळींची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणखी शिवभोजन केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिवभोजन केंद्र सुरू करताना प्रामुख्याने शासकीय इमारती, बसस्थानक, रुग्णालये या ठिकाणांचा विचार करण्यात येणार आहे.
सध्या शहरात सुरू असलेले शिवभोजन केंद्र
हडपसर गाडीतळ येथे शिवसमर्थ भोजनालय, कात्रज बसस्थानक येथे हॉटेल कात्रज कॉर्नर, स्वारगेट येथे बसस्थानक कॅन्टीन, मार्केटयार्ड येथे हॉटेल समाधान गाळा नंबर 11, शिवाजीनगर येथे कौटुंबिक न्यायालय कॅन्टींन, पुणे महापालिका येथे हॉटेल निशिगंधा या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू केले आहे.