कातरखटाव – खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यंत 19 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात आजमितीस 49 हजार 730 नागरिक बाहेरून आल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात बाधितांची एकूण संख्या 271, घरी सोडलेले 143 नागरिक आहेत. कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेरून आलेल्या पाच हजार 17 नागरिकांची नोंद झाली असून क्वारंटाइन पूर्ण झालेले चार हजार 738 नागरिक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युन्नूस शेख यांनी दिली.
मोठ्या गावामध्ये रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे. एनकूळ, कणसेवाडी, डाळमोडी, खातवळ, पडळ, दातेवाडी, यलमरवाडी, तडवळे या गावांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. कातरखटाव, डांभेवाडी, येरळवाडी, बोंबाळे, बनपुरी, हिंगणे या गावांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या बाहेरून येणाऱ्यां प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी संसर्ग वाढत आहे.
ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
“आओ जाओ घर तुम्हारा’ काही गावांमध्ये कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बंदोबस्त नसल्याने कंटेन्मेन्ट झोन असलेल्या गावांमधून लोकांचे येणे-जाणे सुरुच आहे. प्रशासनाचे सहकार्य नसल्याने व्यापारी वर्गात नाराजी आहे. त्यामुळे “आओ जाओ घर तुम्हारा’, अशी स्थिती आहे.
जोश कागदावरच…
काही गावांमधील ग्रांमपंचायती, ग्राम दक्षता समित्यांनी सुरुवातीला चांगलाच जोश दाखवला. नाकाबंदी, मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना काही दिवस शिस्त लागली होती; परंतु ग्राम समित्यांचा हा जोश पुढे टिकला नाही तर तो कागदावरच राहिल्याचे दिसून येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुरवातीच्या काळात अर्सेनिकम अल्बम गोळ्यांचे वाटप झाले आणि लोकांनी त्या घेतल्या; पण आता त्याचा विसर पडला आहे.