मुंबई – करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लसीकरणालाही वेग आला आहे. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. जुलै महिन्यात मुंबई विमानतळावरून प्रवास केलेल्यांची संख्या 59 टक्क्यांनी वाढून 11 लाख इतकी झाली आहे. आठवड्याच्या शेवटी बऱ्याच प्रवाशांनी विमानाने प्रवास केल्याचे दिसून आले.
विमान कंपन्याही आता उड्डानांची संख्या वाढविण्याची तयारी करीत आहेत. जुलै महिन्यामध्ये मुंबई विमानतळावरून 11,400 उड्डाणे झाली. पाच जुलै अगोदर विमानातून फक्त पन्नास टक्के प्रवाशांना प्रवास करता येत होता. मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने क्षमतेच्या 65 टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
मुंबईबरोबरच दिल्ली, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद या ठिकाणच्या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भारतातील विविध विमानतळावरून देशांतर्गत विमान उड्डाणाची त्याचबरोबर परदेशी विमान उड्डाणाची संख्याही वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.