नगर – जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या कमी होऊ लागली आहे. लाखाच्यावर मजूर क्षमता असलेली 33428 कामे उपलब्ध असताना सध्या जिल्ह्यामध्ये रोहयो अंतर्गत 1595 कामे सुरू असून त्यावर एकूण 6 हजार 164 मजूर काम करीत आहेत. जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये बहुतांश गावांमध्ये परतीच्या पावसाने लावलेली हजेरी, व त्यामुळे शेतीची वाढलेली कामे यामुळे मजुरांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत गरजू असणाऱ्या कुटुंबाला वर्षात 100 दिवस काम उपलब्ध करून देण्यात येते या कामासाठी प्रतिव्यक्ती 206 रुपये कामाचे दाम निश्चित करण्यात आले आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग व महसूल यंत्रणेमार्फत राबवण्यात येते. या योजनेतून गरजू मजुरांना वर्षातून शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो .या योजनेअंतर्गत घरकुल व्यक्ती विहिरी गोठा कॉंक्रिटीकरण वृक्ष लागवड शौचालय विहीर पुनर्भरण शोष खड्डे रोपवाटिका आधी कामे करण्यात येतात.
सध्या कामे उपलब्ध असताना सुद्धा शेतातील कामे वाढल्यामुळे मजुरांनी रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत गरज असेल, त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत लोकांना रोजगार देण्यात आला. दुष्काळाची दाहकता तीव्र झाल्याने मार्च महिन्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या 18 हजारांपर्यंत गेली होती.
जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तर, सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे रोहयोअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांवरील मजुरांची संख्या कमी होऊ लागली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोहयोवरील मजुरांची संख्या 6 हजार 708 पर्यंत आली होती. आता ही संख्या आणखी कमी झाली आहे.
मागील आठवड्यातील अहवालानुसार जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये मिळून ग्रामपंचायतीअंतर्गत 1159 कामे सुरू असून या कामांवर 3 हजार 227 मजुरांची उपस्थिती आहे. तर, विविध यंत्रणांच्या अंतर्गत 438 कामे सुरू आहेत.