नवी दिल्ली : भारतात करोनाने 24 तासांत 71 रूग्णांचा बळी घेतला. देशातील एकाच दिवसातील मृतांची ती संख्या आजवरची सर्वोच्च ठरली. त्यामुळे देशातील करोनाबळींच्या संख्येने 1 हजारचा टप्पा ओलांडला आहे. देशात करोनाबाधित आणि बळींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रात करोनामुळे 400 हून अधिक रूग्ण दगावले आहेत.
तर, दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरातमधील मृतांची संख्या 200 जवळ जाऊन पोहचली आहे. त्या राज्यात 4 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. मध्यप्रदेशातील करोनाबळींच्या संख्येने शंभरी पार केली आहे. तर, दिल्ली आणि राजस्थानमधील मृतांचा आकडा पन्नाशीवर पोहचला आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक दिवसात 1 हजार 813 ची भर पडली.
त्यामुळे देशातील रूग्णसंख्या 32 हजारांच्या घरात पोहचली आहे. दिल्लीत 3 हजार 300 हून अधिक बाधित आहेत. तर मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि तामीळनाडू या चार राज्यांत प्रत्येकी 2 हजारांहून अधिक रूग्ण आढळले आहेत. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 111 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोना संकटात रूग्ण बरे होण्याचे भारतातील प्रमाण दिलासादायक आहे. देशातील 7 हजार 700 हून अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहे. ते प्रमाण 24.52 टक्के इतके आहे.