नवी दिल्ली – भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी 2 लाखांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत भारत आता सातव्या स्थानी पोहचला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन आणि इटलीनंतर भारताचा क्रमांक लागला आहे.
भारतात सोमवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 8 हजार 171 नवे करोनाबाधित आढळले. देशात सर्वांधिक 72 हजार 300 बाधित महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत 24 हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीनेही 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर गुजरातमध्ये 17 हजारांहून अधिक रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
देशात करोना संसर्गामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5 हजार 800 च्या घरात पोहोचली आहे. देशात करोनाने महाराष्ट्रात सर्वांधिक 2 हजार 465 बळी घेतले आहेत. बळींच्या संख्येत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या राज्यात 1 हजारहून अधिक करोनाबाधित दगावले आहेत. दरम्यान, देशातील सुमारे 97 हजार बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.