मुंबई : राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. रविवारी झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 217 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5064 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.