नवी दिल्ली : करोनामुळे देशात आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना बाधितांची संख्या १२, ३८० झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापैकी १४८९ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तर १० हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये १२३ जिल्ह्यात १७० करोनाचे हॉटस्पॉट आहेत. दिल्ली-मुंबईमध्ये सर्वाधित चिंतेचे वातावरण आहे.
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.