नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांमध्ये १,६८५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३४.०६ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. करोनासंदर्भातील १५ व्या मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमुळे करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण ३.४ दिवस होते पण, आता ते १२.९ दिवसांवर पोहोचले आहे.
देशातील ३० महापालिका क्षेत्रांमध्ये ७९ टक्के करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, चेन्नई, दिल्लीतील ११ जिल्हे, गुतरातमधील अहमदाबाद, सुरत आणि बडोदा या शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
महाराष्ट्र (२७,५२४), तमिळनाडू (९,६७४), गुजरात (९,५९१), दिल्ली (८,४७०) या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रतिबंधात्मक उपाय करण्यासंदर्भात प्रामुख्याने मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.