नवी दिल्ली – भारतात यापुर्वी 1750 जणांचे मृत्यू करोना संबंधित आजाराने झालेले पाहिले असतील. पण, ही संख्या जुनच्या पहिल्या आठवड्यात 2 हजार 320 पर्यंत वाढू शकते, असा दावा भारतातील करोनाबाधितांसाठी निर्माण केलेल्या टास्क फोर्सच्या लान्सेट कोविड 19 आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.
“मॅनेजिंग इंडियाज सेकंड कोविड वेव्ह : अर्जंट स्टेप’ या नावाने केलेल्या या अहवलात करोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींवर प्रकाश झोत टाकण्यात आला आहे. त्यात 15 उपायही सुचवण्यात आले आहेत. व्यापक लसीकरण मोहीम, मेळाव्यांवर तात्पुरती बंदी, विषाणूचा संसर्ग अचानक वाढण्यासाठी निमित्त मात्र ठरलेल्या कारणांचा शोध आदींचा त्यात समावेश आहे.
या अभ्यासात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट दोन मुख्य प्रकारे वेगळी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान रुग्णवाढीची संख्या 10 हजाराहून 80 हजारावर अवघ्या 40 दिवासांत गेली. मात्र सप्टेंबर 2020 मध्ये त्यासाठी 83 दिवस लागले होते. तुलनेत दुसऱ्या लाटेतील बाधित लक्षणे विरहीत किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी असणारे आहेत. त्यामुळे रूग्णालयात दाखल करावे लागलेले अथवा मृत्यू पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत 2 लाख 17 हजार 353 बाधित होण्याच नवा उच्चांक निर्माण झाला. त्यामुळे देशातील सक्रिय बाधितांची संख्या 15 लाख 69 हजार 743 आहे. ती एकूण बाधितांच्या संख्येत10.98 टक्के आहे. गेल्या 24 तासांतच 97 हजार 866 सक्रिय बाधितांच्या संख्येमध्ये वाढ झाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तिसगढ, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, आणि प. बंगाल या 10 राज्यांमध्ये करोना बाधितांची संख्या 79.10 टक्के आहे.