पुणे -“निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे शहरात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे करोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली नसल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविले आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ऋतू बदलामुळे वाढणाऱ्या सर्दी, ताप, खोकल्यांच्या रुग्णांचीही करोना चाचणी सतर्कता म्हणून केली जाणार आहे.
राज्यात “निसर्ग’ चक्रीवादळाने (दि.3) कोकण परिसरासह मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचे मोठे नुकसान केले. सलग तीन दिवस पडत असलेला पावसामुळे हवामान बदल झाला. त्याचा परिणाम करोनाबाधित संख्या वाढीवर होणार, अशी भीती होती. मात्र, मागील आठ दिवसांत बाधितांची संख्या वाढलेली दिसत नाही. उलट दररोज, 200 ते 300च्या पुढे असणारी बाधित संख्या 200च्या आत आली आहे.
वादळापूर्वी सात दिवसांत शहरात 1 हजार 556 बाधित सापडले. त्यामध्ये रविवार (दि. 31 मे) रोजी सर्वात कमी नमुने तपासणी झाल्यामुळे बाधितांची संख्या थेट 57 पर्यंत खाली आली होती. याच आठवड्यात 83 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर 19 टक्के होता. दुसरीकडे चक्रीवादळानंतर (दि. 4 ते 10 जून) शहरात बाधितांची संख्या 1 हजार 539 इतकी आहे. तर 64 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर 14 टक्के म्हणजे मागील आठवड्याच्या तुलनेत पाच टक्के मृत्यूदर कमी झाला आहे.
तपासणी संख्या वाढणार
पावसाळा आणि ऋतू बदलामुळे आता सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. तर करोना बाधितांची लक्षणे देखील हीच असल्यामुळे रुग्णालयात सर्दी, ताप असलेला रुग्ण आल्यावर त्याला औषधे देऊन घरी पाठविणे आता धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी ही लक्षणे असलेल्या रुग्णांची नमुने तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी स्वॅब तपासणीची संख्या वाढवावी लागणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.