पुणे: सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रिंगणात उतरली असून, संपूर्ण राज्यभर प्रचाराची राळ उडवून दिली आहे. आज पुण्यातील कोथरूड मतदार संघात राज ठाकरे यांची सभा सुरु आहे. दरम्यान, त्यांनी भाजपवर टीका केली.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
- कोथरूड विधानसभेची लढतीने ह्या निवडणुकीत रंगत आली आहे. बाहेरचा उमेदवार जेंव्हा कोथरुडकरांवर लादला जातो कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं, की आम्ही कोणालाही तुमच्यावर लादला तरी त्याला निवडून देईल
- जे चंद्रकांत पाटील राज्यात मंत्री होते, ज्या कोल्हापुरात त्यांचं आयुष्य गेलं तिथे तुम्ही निवडणूक का नाही लढवली? मी मागे म्हणलं तसं की सांगली कोल्हापुरात पूर आला आणि तिथला एक माणूस वाहत वाहत कोथरूडला आला.
- कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देणं हा सत्तेचा माज आहे.
- पूर्वी कधी नव्हतं इतका विचार हल्ली निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना तिथली जातीची गणितं आधी बघितली जात आहे. हे असं महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं ज्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिला तिथे जातीचा पातीचा विचार रुजतोय हे धोक्याचं आहे
- मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उध्वस्त केला त्यांना राम गणेश गडकरी माहित तरी आहेत का? आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत
- मतदासंघाचा उमेदवार हा कोणत्या जातीचा आहे हे न बघता तो तुमच्या हाकेला ओ देणार का नाही इतकाच असायला हवा. आणि कोथरूडच्या म्हणाल तर तुमचा आमदार इथलाच कोथरुडमधलाच हवा, कारण तो तुमच्या हाकेला कायम धावून येईल. चंद्रकांत पाटील कधीही हाताला तुमच्या लागणार नाहीत
- पुणे जिल्हा जे वाहन उद्योगाचं देशातील मुख्य केंद्र आहे, तिथे ह्या क्षेत्रात मंदीचं भीषण सावट आहे आणि त्यामुळे त्याच्याशी निगडित उद्योगधंदे बंद पडायला लागले आहेत, ह्या जिल्ह्यात बेकारांची संख्या वाढायला लागली आहे. आणि पुढे हे चित्र अधिक भीषण व्हायला लागणार आहे
- पुण्यात बाणेरमध्ये लोकांना गाड्या पार्क करू दिल्या जात नाहीत; आणि का तर पुण्याचे खासदार ट्रॅफिक मध्ये अडकलं म्हणून अचानक ही कारवाई सुरु झाली आहे, मग पुणेकर रोज त्या ट्रॅफिक मध्ये अडकत होते तेंव्हा का नाही कारवाई केली?
- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या केल्या तर शहरी भागात बँका बुडल्यामुळे तणावाखाली आलेले ठेवीदार मृत्युमुखी पडत आहेत. प्रश्न सुटायच्या ऐवजी जटिल होत आहेत.
- पुण्यासारख्या शहरात ट्रॅफिक ही सगळ्यात मोठी समस्या आहे, आणि लोकांना का रस्त्यावर वाहनं पार्क करावी लागत आहेत कारण लोकांना पार्किंगसाठी वाहनतळंच उपलब्धच नाही आहेत आणि जे भूखंड वाहनतळासाठी राखीव होते ते भूखंड सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांच्या घशात घातले आहेत
- एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळला आहे आणि महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणजे गडकिल्ले सरकार इव्हेन्ट आणि पार्ट्यांसाठी भाड्याने द्यायला निघाला आहे, हे का होतंय कारण सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेलाय
- मंत्री लाल दिव्याच्या गाडीतून फिरत राहणार, त्यांना काय फरक पडणार, भोगावं तुम्हाला लागणार आहे. म्हणून तुमची आमदार खासदारांवर जरब असायला हवी.
- माझ्या हातात सत्ता नसताना देखील माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर तांडव करून सरकारला असे अनेक निर्णय घ्यायला लावले जे सात्ताधाऱ्यांना सत्तेत बसून देखील नाही करून दाखवता आलं
- मी विरोधी पक्षासाठी जी भूमिका घेतली आहे ती फक्त विरोधासाठी विरोध करायचा म्हणून नाही. सरकारचं चुकलं तर त्यांच्यावर प्रहार करणारा मीच असतो पण जेंव्हा काश्मीर मधलं ३७० कलम काढलं तेंव्हा अभिनंदन करणारा पण मीच होतो
- जो पर्यंत सक्षम आणि कोणाही समोर घरंगळत न जाणारा विरोधी पक्ष जो पर्यंत विधानसभेत असणार नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत