भिगवण – करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले; परंतु शासनाने काही व्यवसायांना परवानगी दिली आहे. काही व्यवसायांवर मात्र अद्यापही बंधने कायम आहेत. सार्वजनिक धार्मिक स्वरूपाचे कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक समाजघटकांचे जीवन त्यामुळे बिकट बनत चालले आहे. त्यामुळे “गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी’ असा आवाज बंद झाला आणि जागरण, गोंधळ करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली.
जागरण गोंधळाचे कार्यक्रम करणारे अनेक समाजघटक आहेत. त्यामध्ये डवरी गोसावी समाजातील नागरिक हे जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत असतात. डवरी गोसावी समाजातील अनेक कुटुंबे इंदापूर तालुक्यातील डिकसळ, अंथुर्णे, कळस गावांमध्ये राहतात. या कुटुंबांपैकी सुमारे शंभर कुटुंबे ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम करीत असतात. सध्या या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गावांमध्ये पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. काही कुटुंबांतील व्यक्ती हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात, पण उन्हाळ्याच्या दिवसांत शेतातील कामे कमी असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
इंदापूर तालुक्यात वकीलवस्ती व लगतच्या काही गावांमध्ये जोशी समाजातील काही कुटुंबे राहतात. यातील सुमारे 25 कुटुंबे ही तुळजाभवानी देवीच्या जागरण, गोंधळ, भुते गोंधळी म्हणून काम करतात. यांच्यावरही अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे. पारंपरिक कलाकार लोककलेची जपणूक करत परंपरा आणि संस्कृतीमध्ये सातत्य ठेवत समाजाच्या धार्मिक बाबींची पूर्तता करतात. त्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबासाठी चार पैसे मिळतात पण सध्याच्या दुर्लभ अशा प्रकारच्या संकटामुळे भूतो न भविष्यती अशी स्थिती त्यांच्यावर आली आहे.
हातातोंडाशी गाठ होईल एवढीच कमाई
पारंपरिक कलाकार लोककलेची जपणूक करत हातातोंडाशी गाठ होईल एवढीच कमाई हे समाजघटक करतात, त्यामुळे काही काळ कुटुंबाची गुजराण करता येईल, अशी शिदोरी त्यांच्याकडे नाही. म्हणून आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी रोजगाराची उपलब्धता करण्याचा प्रयत्न हा समाजघटक करत आहे. विविध नियमांमुळे आणि ते कुशल कामगार नसल्याने त्यांना रोजगार मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. याबाबतीत कुशलता आहे, ते काम लगेच सुरू होईल अशी शाश्वती नाही.
सध्या जागरण-गोंधळाची सुपारी मिळत नाहीत, परिणामी रोजगाराचे महत्त्वाचे साधन नसल्याने या समाजाची स्थिती हलाखीची बनत चालली आहे. या समाजासाठी रोजगाराबाबत दीर्घकालीन स्वरूपात नियोजन करावे. करोना लवकर संपणार नाही आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची ताकद या समाजघटकांमध्ये यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
– नवनाथ सावंत,
कलाकार, डिकसळ.