पुणे : इयत्ता नववीच्या नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा न घेता त्यांना थेट इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
कोरोनामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. शासनाने बऱ्याचशा परीक्षा रद्द केल्या असून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना आहेत.
काही शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यांची पुनर्परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या संकट काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. एमबीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाऊ शकतात, तर नववीत नापास विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा रद्द का होऊ शकत नाहीत, असा प्रश्न विटकर यांनी उपस्थित केला.
नववीच्या पुनर्परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांना दिले आहे.