पुणे – शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी (दि.5) मात्र, उघडीप दिली. शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात शिवाजीनगर-5 मिमी तर लोहगावमध्ये 4 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरात मध्यम तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र, किनारपट्टी भागाला “ऑरेंज अलर्ट’
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिवृष्टी या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार (ऑरेंज अलर्ट) तर उर्वरित भागातील जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
“एनडीआरएफ’च्या 15 तुकड्या तैनात
पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत सर्वाधिक, सोलापुरात सर्वांत कमी
राज्यात गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि महाबळेश्वर परिसरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर सोलापुरात सर्वांत कमी पाऊस म्हणजे 2 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.