पावसाचा जोर वाढला; मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार
पुणे – राज्यातील मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढले असून, पुढील तीन ते चार दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातील घाटमाथ्यावर तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नंदुरबार आणि धुळे या भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात सर्वच भागात पावसाचा जोर चांगला असल्याचे दिसून आले.
राज्यातील मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकणात गेल्या सुमारे सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, या परिसरातील सखल भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागातील मुसळधार पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या या भागात काहीच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.