नवी दिल्ली – बिहारमधील मित्रपक्ष जेडीयूबरोबरचे संबंध तोडल्यानंतर लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचे थेट आवाहन लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जनतेला केला आहे. एवढेच नव्हे तर, बिहारमध्ये पुढील सरकार भाजप-लोजप युतीचे असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
बिहारमधील सत्तारूढ एनडीएचे घटक असणाऱ्या जेडीयू आणि लोजपमधील दुरावा मागील काही दिवसांपासून वाढत गेला. त्यातून रविवारी जेडीयूच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय लोजपने जाहीर केला.
अर्थात, भाजपबरोबरची युती लोजपने कायम ठेवली आहे. आता तो पक्ष जेडीयूच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. लोजपच्या निर्णयानंतर चिराग यांनी बिहारी मतदारांना उद्देशून एक पत्र जारी केले.
त्याद्वारे त्यांनी बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट या लोजपच्या घोषणेचा पुनरूच्चार केला. विधानसभा निवडणूक हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत निर्णायक क्षण आहे. राज्यातील 12 कोटी जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता आपल्याकडे हरण्यासाठी वेळ नाही. लोजपचा पुढील मार्ग सोपा नाही. तरीही आपण लढू आणि जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी जेडीयूला दिलेले एक मतही उद्या तुमच्या मुलांना स्थलांतर करण्यास भाग पाडेल, असा इशाराही चिराग यांनी दिला.