मुंबई: केंद्रसरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात सध्या स्थगिती देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. “नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांचे या पत्राला उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कायद्याप्रमाणेच दंडवसूली केली जाईल”. असे रावते यांनी सांगितले आहे.
या नवीन कायद्याला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याची परिस्थिती आहे. तसेच आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान या कायद्याचे समर्थन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, “नव्या कायद्यातील दंडाची तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी करण्यात आलेली नाही तर, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी करण्यात आली आहे.”