कराड – सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गांची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, हे करत असताना महापुराचा सारासार विचार केला जाणार असूुन तिन्ही जिल्ह्यांमध्ये तयार होणारा महामार्ग महापुराच्या पाण्यात बुडणार नाही तसेच हा महामार्ग अपघातमुक्त व्हावा यासाठी महामार्गांच्या बांधणीत मोठे बदल केले जाणार आहेत.
तशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. त्या नव्या महामार्गांची आखणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी येथे दिली. दरम्यान, येणाऱ्या काळात पुणे ते बंगळूरू हा नवा एक्सप्रेस महामार्गही तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाच्या नागज ते मुचंडी व तासगाव ते शिरढोण रस्त्याचा लोकार्पण आणि सातारा ते कागल मार्गाचे सहापदरीकरण, मसूर फाटा, इंदोली व काशिळ येथे अंडरपास पूल, मिरज येथे रस्ता सुधारणा, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ते आंबोली ते संकेश्वर रस्त्याचे उन्नतीकरण, कळे ते कोल्हापूर विभागाच्या रस्त्याचे उन्नतीकरण, घाटमाथा ते हेळवाक रस्त्याचे मजबुतीकरण व केंद्रीय रस्ते बजेटमधून रस्त्यांच्या सुधारणा कामांचा कोनशिला समारंभ आज येथे पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते.
कार्यक्रमास पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. धैर्यशील माने, खा. संजय पाटील, खा. संजय मंडलिक, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. ऋतुराज पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. प्रशांत परिचारिक, आ. मानसिंगराव नाईक, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “”पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधत आहोत. सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या खासदार, आमदारांनी एक बैठक बोलवा. आमच्या अधिकाऱ्यांना आराखडा द्या. या भागातील एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, असा आपण बांधू अशी गडकरींनी ग्वाही यावेळी दिली. कोल्हापूर ते सांगली हा रस्ताही मोठा होणार आहे.
त्या रस्त्यावरही महापुराचा मोठा धोका आहे. त्या मार्गावरील महापुराचे सर्व अडथळे दूर करून तो रस्ता विस्तारीत होणार आहे. तब्बल 30 ते 35 किलोमीटरचा रस्त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला आहे. त्याही रस्त्यावर पुराचे पाणी येणार नाही, याची काळजी घेत आहोत. पुराच्या पाण्यापासून रस्ते सुरक्षित राहतीलच.
त्याशिवाय सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक केली आहे. अपघात कमी कसे करता येतील, याचा आम्ही अभ्यास करून रस्त्याची उभारणी करत आहोत.”
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “शेंद्रे ते कागल हा टप्पा 20114 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला थोडा उशीर झाला. आज या परिसरात या कामांचा शुभारंभ होत आहे. या कामांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यायला हवा.’ रस्ता म्हटले की हल्ली गडकरी यांचे नाव असते. ते जे प्रकल्प सुचवतील त्याला त्या प्रकल्पांना राज्य सरकारचे सहकार्य निश्चित असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देतो.
नितीन गडकरी हे गडकरी आहेतच पण ते रोडकरीही आहेत. त्यांनी केलेल्या रस्त्यांचे प्रकल्प परदेशात असल्यासारखे झाले आहेत, असे खासदार नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. गडकरी महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार आहेत, असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. देशात जिकडे जावे तिकडे गडकरींच्या कामाचा ठसा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे ते बंगळुरू नवा महामार्ग दिशादर्शक
उत्तर भारतातून येणारी वाहतूक मुंबई, सातारा, पुण्याकडे जाते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता येणाऱ्या काळात पुणे ते बंगळुरू नवा महामार्ग आपण तयार करत आहोत. यासह सुरत, नाशिक, अहमदनगर, तामिळनाडू असा रस्ता करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प दिशादर्शक असेल. खरं तर पहिले प्राधान्य जलमार्ग आहे. महाराष्ट्रात जलमार्गाचा विकास व्हावा असे वाटते.