नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होणार आहे. दरम्यान, लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली, तसेच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
New guidelines to fight #COVID19 will come into effect from 4th May, which shall give considerable relaxations to many districts. Details regarding this shall be communicated in the days to come.#coronavirus update#StayHomeStaySafe@PMOIndia @HMOIndia @MoHFW_INDIA
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) April 29, 2020
“केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भातील आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. देशात लॉकडाउन राबवल्यामुळे परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या सुधारलेल्या परिस्थितीवर कोणाताही परिणाम होऊ नये यासाठी ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स जारी केल्या जातील. तसेच जिल्ह्यांमधील परिस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी सुट दिली जाईल. येत्या दिवसांमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात येईल,” अशा आशयाचे ट्विट केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यालयाने लॉकडाउनमुळे देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येणार असून त्यासंबंधीही गृहमंत्रालयाने आदेश जारी केला होता.