पुणे : पुणेकरांना पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासनाने तिसऱ्यांदा जाहीर केलेला 7 जूनचा नवीन मुहूर्तही हुकला आहे. महापालिकेच्या पथ विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभागात असलेल्या समन्वयाअभावी ही स्थिती उद्भवली आहे. शहरातील पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती जूनचा पहिला आठवडा उलटूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे “नेमेचि येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणेच “नेमीची येतात रस्त्यावर खड्डे’ असे म्हणत पुणेकरांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागणार आहे. यापूर्वी प्रशासनाने 15 मे, नंतर 31 मे त्यानंतर 7 जूनपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, हे तीनही मुहूर्त हुकल्याने रस्ते दुरुस्त कधी होणार याबाबत कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
65 कोटींच्या निविदांचा घाट कशासाठी?
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत पालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. मागील दोन वर्षांत, तर चक्क भर पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी महापालिकेत लोकप्रतिनिधी कार्यरत होते. मात्र, यावर्षी पालिकेवर प्रशासक नियुक्ती असताना हे काम वेळेत होईल अशी अपेक्षा होती. त्या, अनुषंगाने प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरी खोदाईस 30 एप्रिलपासूनच बंदी घालण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने खोदलेले रस्ते 15 मेपर्यंत दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर, विकासकामांच्या नावाखाली पालिकेच्या कामांना मात्र 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी 31 मेपासून काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर पुन्हा पालिकेच्या खोदाईस 31 मेपर्यंतची मुभा देत रस्ते दुरुस्ती 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले. मात्र, 7 जून संपला तरी पालिकेची शहरातील खोदाई अद्यापही सुरूच असून एक इंच रस्ताही पालिकेकडून दुरूस्त करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाने मे महिन्यातच तब्बल 65 कोटींच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्ती पावसाळ्यात करून 65 कोटींचा खर्च प्रशासन पाण्यात घालणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
‘रस्ते दुरुस्तीची कामे 7 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार होती. मात्र, अद्याप ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागाची कामे सुरू आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन असून त्याबाबत दोन्ही विभागांना कळविण्यात आले आहे.’
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख