नगर: कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला. विकास-विकास म्हणतात पण तो कसा असतो, हे आम्हाला एकदा दाखवा, अशी मागणी या लोकांनी केली, असल्याचे पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर देखील टीका केली. रस्त्याचे कामे केले म्हणजे विकास नव्हे असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडमध्ये वाहत असलेल्या बदलाच्या वाऱ्याचं आता हळूहळू वादळात रुपांतर होऊ लागलंय, याची झलक काल जामखेड भागात पहायला मिळाली. अनेक नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना फक्त आश्वासनं देऊन नंतर कसं वाऱ्यावर सोडलं, याचं गाऱ्हाणं मांडलं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला.
विकास-विकास म्हणतात पण तो कसा असतो, हे आम्हाला एकदा दाखवा, अशी मागणी या लोकांनी केली. शेवटी ते तरी करणार काय? त्यांची कामं होणं महत्वाचं आहे. किमान पाणी, रस्ता, वीज, शाळा या गरजा तरी पूर्ण व्हायला पाहिजेत ना. त्यासाठी लोकांनी आणखी किती वर्षे वाट पहायची?
समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळात खऱ्या विकासाची कामं कशी करायची याबाबतची माहिती मी त्यांना दिली आणि त्यासाठी पुढच्या काळात सर्वांची साथ कायम ठेवा, असं आवाहन यावेळी केलं. खऱ्या विकासासाठी परिवर्तन हा एकमेव पर्याय असल्याचं लोकांचं म्हणणं असल्यामुळं कर्जत-जामखेडमध्ये नवा बदल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं उघड आहे.