जुनी इमारत होणार इतिहासजमा; सुसज्ज वास्तूसाठी सुमारे दीड कोटींची तरतूद
मसूर (प्रतिनिधी) – गेल्या 80 वर्षांपासून मसूरच्या इतिहासाची साक्ष देत मोठ्या दिमाखाने उभी असलेली ग्रामपंचायतीची इमारत आता इतिहासजमा होणार आहे. शनिवार, दि. 1 ऑगस्ट रोजी ही वास्तू उतरवण्यात आली. सुमारे दीड कोटी रूपयाच्या खर्चातून एक वर्षाच्या कालावधीत सुसज्ज अशी नवी वास्तू येथे उभी राहणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील, शाहीर अमर शेख यांच्या ऐतिहासिक सभांची साक्षीदार असलेली ही इमारत आहे. 1940 साली मसूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. मसूर हे कराड तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्य लढ्यात या भागातील चळवळीचे हे मुख्य केंद्र होते. सुरूवातीच्या काळात स्वातंत्र्यसैनिक प्रतापराव जगदाळे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांच्याच काळात मसूर बाजारपेठेत भुईकोट किल्ल्याला लागून ही ग्रामपंचायतीची पूर्वाभिमुख दगडी इमारत बांधण्यात आली. या चिरेबंदी वास्तूने असंख्य उन्हाळे – पावसाळे पाहिले, भूकंप पचवले. पण इमारतीचा चिराही हलला नाही.
मसूरचा भव्य विस्तीर्ण आवार, त्यामध्ये बाजारासाठी खूप पूर्वी बांधलेले कठडे, सुयोग्य उंचीवर ग्रामपंचायतीचे प्रवेशद्वार, त्यापुढे त्याची शोभा वाढवणारे व्यासपीठ, बाजूला मैदान व स्वतंत्र व्यासपीठ या सर्वच गोष्टींमुळे ग्रामपंचायत इमारतीच्या सौंदर्य आणखीनच वाढले होते. या इमारतीशी प्रत्येक मसूरकराचे भावनिक नाते जोडले गेले आहे. ही इमारत मसूरची ओळख बनली आहे. प्रताप जगदाळे, हिंदुराव जगदाळे, रतनचंद शहा, संपतराव बर्गे, दत्तू पाटील, धोंडिराम शिरतोडे, दत्तात्रय महाजन, वसंतराव जगदाळे, रायचंद शहा, मानसिंगराव जगदाळे यांनी ग्रामपंचायतीचे काम उत्कृष्टरित्या चालवले. मानसिंगराव जगदाळे यांनी सलग 15 वर्षे सरपंचपद भूषवले. त्यांनी मसूरचा लौकिक वाढवण्याचे काम केले. सध्या पंकज दीक्षित हे सरपंच आहेत. मसूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच असा मान त्यांना मिळाला आहे. मसूरचा वाढता विस्तार व कामाचा व्याप या पार्श्वभूमीवर मानसिंगराव जगदाळे यांच्याच प्रयत्नातून मसूर ग्रामपंचायतीची नवी इमारत उभारण्याचे काम सुरू होत आहे.
सध्याची इमारत उतरवून त्या जागी तीन मजली बहुउद्देशीय इमारत उभी राहणार आहे. या इमारतीत तळमजल्याच्या ठिकाणी स्टोअर, ग्रामपंचायतीच्या वाहनांसाठी पार्किंग असेल. वर ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचे दालन, बैठक हॉल, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. याव्यतिरिक्त या वास्तूत तलाठी, मंडल अधिकारी, कृषी अधिकारी यांची कार्यालये असणार आहेत.
नवी इमारत उभारण्यासाठी सुमारे दीड कोटी रूपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी जवळपास एक कोटी रूपये जिल्हा ग्रामीण विकास निधीतून कर्जरुपाने घेण्यात येणार आहेत. इमारत पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार असून तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज चावडी चौकात असलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या इमारतीत चालणार आहे. शनिवारी मसूर ग्रामपंचायतीची जवळपास 70 – 75 वर्षाची जुनी इमारत उतरवण्याचे काम सुरू झाले. शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते नवीन इमारतीचे विधीवत भूमिपूजन करण्यात येणार आहे.