संगमनेर -संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी अवैध वाळूवाहतुकीने तिघांचा बळी घेतला. मात्र मोठी दुर्घटना घडूनही वाळूतस्कर दिवसा ढवळ्या कालबाह्य झालेली वाहने घेऊन वाळूचा उपसा करत आहेत. वेळीच या वाळू तस्करांच्या मुसक्या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळी आठ ते साडेआठवाजे दरम्यान संगमनेर येथून एक व्यक्ती कुटुंबासोबत पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्याजवळ पुण्याच्या दिशेने जात असताना एक वाळूने खचाखच भरलेले वाहन त्यांच्या गाडीला कट मारून गेले.
याबाबत कट मारणाऱ्या चालकास जाब विचारला असता, त्याने उलट या इसमालाच सुनावले. तसेच आमचे कोणी काही करू शकत नाही, आम्ही भितोय का कुणाला? असे म्हणत तेथून सुसाट वेगाने वाळूने भरलेले वाहन नेले. संबंधित व्यक्तीने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
वाळूवाहतुकीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिघा मजुरांचा जीव घेतला. तरीही हे मुजोर तस्कर अजूनही सुधरायचे नाव घेत नाहीत. दिवसा खांडगाव परिसरातून वाळू उपसा करून कालबाह्य झालेल्या वाहनांद्वारे पोहचवली जाते. तस्करीसाठी जी गाडी वापरण्यात येते, तिच्यावरील नंबर प्लेटही दुसऱ्याच गाडीची लावून प्रशासनाची दिशाभूल केली जाते.
त्यामुळे त्यांची मुजोरी वाढत आहे. ही परिस्थिती पाहता, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. महसूल विभाग व पोलिसांनी एकत्रित कारवाया करून वाळूतस्करांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत. कायद्यापुढे कोणी मोठा नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.
पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा
संगमनेर तालुक्यातील देवगड जवळ वाळूच्या गाडीचा अपघात होऊन तीन जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना खांडगाव येथून अशा कालबाह्य व चोरीच्या पिकअपच्या साह्याने अवैध वाळूचा उपसा पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरूच असल्याची नागरिकात चर्चा आहे.