नदी प्रदूषित तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा
आळंदी – राज्यभरातून येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने पवित्र समजल्या जाणाऱ्या “इंद्रायणी’त राडारोडा व कचरा टाकण्यास आता बंधने येणार आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने हद्दीतील इंद्रायणीनदी पुलावर दोन्ही बाजुस लोखंडी जाळ्या बसविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.
आळंदी तिर्थक्षेत्र असल्याने राज्यभरातून येथे भाविक येत असतात अनेक धार्मिक विधींसाठीही येथे मोठी रेलचेल असते. यासह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. याच कारणास्तव सुरक्षा तसेच इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजुने लोखंडी जाळ्या बसविण्यात येत आहेत. 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून इंद्रायणी नदीवरील नवीन व जुना, चाकण चौक येथे दोन्ही बाजूने लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे.
अंदाजे 500 मीटर लांब व 1. 6 मीटर रुंद अशा या जाळीचे स्वरूप आहे. यामुळे पुलावरून नदीत डोकावणे, सेल्फी काढण्यावर बंधने येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपाय ठरणार आहे. या कामाची सुरुवात देखील करण्यात आली असून नवीन पुलावर काम अंतिम टप्यात आहे. लवकरच इतर पुलांवर देखील काम पूर्ण होणार आहे. यामुळे येत्या कार्तिकीवारी काळात गर्दीच्यावेळी पुलावरून भाविकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
पुलावरून इंद्रायणी नदीत राडारोडा टाकण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली आहे. या सर्वांवरती प्राथमिक उपाय म्हणून जाळी बसविल्याने आता केवळ श्रद्धा म्हणून निर्माल्य नदीत टाकणाऱ्या भक्तांच्या कृतीवर कुठेतरी चाप बसेन आणि गटारगंगा होऊ लागलेल्या पवित्र इंद्रायणीच्या प्रदूषणास काही प्रमाणात आळा बसणार आहे. अवघ्या 15 ते 20 दिवसांवर कार्तिकी यात्रा आहे.लाखो भाविक आळंदीत दाखल होणार आहे तत्पूर्वी काम पूर्ण होणार असल्याने भाविक समादान व्यक्त करीत असून पुलावरील प्रवास गर्दीच्या वेळी सुरक्षित होणार आहे.