हृषिकेश – मुस्लीम समाजातील लोक करोना लसीकरण करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे मत भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. मुस्लीम समाजामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज असल्याचेही रावत यांनी म्हटले आहे.
मी मुद्दाम नाव घेत आहे, पण सध्या लसीकरणापासून आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक दूर राहात आहेत. अजूनही त्यांच्या मनामध्ये शंका आहे. अजूनही ते घाबरत आहेत आणि त्यांच्या मनात लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करून लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी, असे आवाहनही रावत यांनी केले.
तुम्ही लस घेतली नाही तर हा करोना नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या करोनाचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकतो. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, असे मी आवाहन करतो, असे रावत यांनी म्हटले आहे. देशातील 80 टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल, असेही रावत यांनी म्हटले आहे.
लसीकरणासंदर्भातील विचित्र नियम पाकिस्तान सरकारने लागू केल्याचा उल्लेखही रावत यांनी केला. पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे, वेतन रोखून धरणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडले आहे. अशा निर्णयांमुळे लसीकरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण करता येते, असे रावत यांनी म्हटले आहे.