नवी दिल्ली – अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी अधिक उत्पादक असणाऱ्या क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्यासाठी बॅंकांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर चार टक्के या नीचांकी पातळीवर आणूनही उद्योग क्षेत्राकडून कर्जाची मागणी कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशातील खासगी आणि सरकारी बॅंकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबरोबर काल तीन तास चर्चा केली.
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरू केली आहे. भारतातील उद्योग जागतिक उत्पादने निर्माण करू शकतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, भांडवल पुरवण्यासाठी बॅंकिंग क्षेत्राची मदत महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्राला आवश्यक ते सहकार्य करण्याचे खात्री मोदी यांनी दिली.
कर्जाचा उठाव केवळ सात टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी कर्ज वितरणात 11.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. उत्पादन वाढविण्यासाठी किंवा प्रकल्प विस्तारासाठी कंपन्यांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ही परिस्थिती वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
रेपोदर केवळ चार टक्के करूनही कर्जवितरण वाढत नाही. त्यामुळे बॅंका रिव्हर्स रेपोदरावर रिझर्व्ह बॅंकेत पैसे ठेवत आहेत.