नवी दिल्ली – भारतात मतदान सक्तीचे करा आणि मतदान न करणाऱ्याला दंड बजावा, असा प्रस्तावAmitabh Kant, Chairman of the NITI
यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असा प्रस्ताव देऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
प्रस्ताव देताना त्यांनी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले आहे. येथे मतदान न करणाऱ्याला 20 डॉलरचा दंड बजावण्यात येतो. हा दंड न भरल्यास तुरुंगवासही भोगावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतातील महानगरांमध्ये मतदान न करणाऱ्या श्रीमंतांसाठी हा प्रयोग अत्यंत उपयुक्त ठरू शकतो असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. कांत यांच्या या प्रस्तावाविरोधात निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष एस. वाय. कुरेशी यांनी मत व्यक्त केले आहे. मतदान करणे जसा नागरिकांचा अधिकार आहे तसाच मतदान न करण्याचा अधिकारही जनतेला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना नोटाचा पर्याय दिला आहे. त्याचा वापर नागरिक करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मतदान सक्तीचे केल्यास रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो नागरिकांचा छळ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
कुरेशी यांना कांत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महानगरांमधील धनाढ्य लोक सतत सरकारला प्रश्न विचारत असतात, टीका करत असतात; परंतु हीच माणसे मतदान करत नाहीत, असे कांत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात असाच अनुभव आला. मतदान न करणाऱ्या हजारो मुंबईकरांना मतदान न करताना लाज कशी वाटली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.