मुंबई – राज्यपालपदावर नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या निवडीसाठी काही निकष निश्चित केले पाहिजेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या पूज्य व्यक्तींचा अवमान करणारी विधाने वारंवार केली आहेत.
राज्याच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून झालेल्या सुटकेशी केली आहे. अशी विधान करणारे लोक कायम राहणे हे दुर्देव आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल हा भारताच्या राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो आणि अशा पदावर कोणाची नियुक्ती केली जाऊ शकते याचे काही निकष असले पाहिजेत. त्यासाठी नियम तयार करावेत, अशी माझी मागणी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा आणि देशाच्या प्रतिकांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात लोक नागरिकांना एकत्र आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आम्ही येत्या काही दिवसांत त्यासाठी एक कार्यक्रम जाहीर करू, आम्हाला फक्त महाराष्ट्र बंद पुरता हा विषय मर्यादित ठेवायचा नाही असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावर बोलताना ठाकरे म्हणाले की,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या समन्वयक मंत्र्यांनी बेळगावच्या भेटीला येऊ नये असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मोैन बाळगले आहे. शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गुवाहाटी येथे जाऊन बेळगाव आणि कर्नाटकातील इतर मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी कामाख्या देवीची प्रार्थना करायला हवी होती, अशी उपरोधिक टिप्पणीही उद्धव ठाकरे यांनी केली.