कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढण्यास होणार मदत
नवी दिल्ली – भारतात शेतीचे क्षेत्रफळ जास्त आहे. शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी शेतीत ड्रोनचा वापर वाढण्याची गरज असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव अंबर दुबे यांनी म्हटले आहे.
उद्योगक्षेत्र, कृषीक्षेत्र, कृषी विद्यापीठे यांनी एकत्रित येऊन या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याची गरज असल्याचे त्यांनी या विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना सांगितले. ते म्हणाले की, खेड्यांत ड्रोनचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढविली जाऊ शकते. शेतीसाठी उपयोगी पडतील अशी कमी किमतीची ड्रोन विकसित करण्यास वाव आहे. यासाठी ड्रोन विकसित करणाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील कृषी विद्यापीठाशी व संस्थांशी सहकार्य करार करावा.
मातीचे परीक्षण, सुयोग्य सिंचन, मातीतील नायट्रोजनचे प्रमाण समतोल राखण्यासाठीचे काम इत्यादी क्षेत्रांत ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. स्टार्टअप्नी काही ड्रोन विकसित केली आहेत. यात अधिक व्यावसायिकता येण्याची गरज आहे. कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी सांगितले की, ड्रोनचा वापर करून जंतुनाशकांची आणि इतर द्रव्यांची फवारणी होऊ शकते.
सिंचनावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय टाळला जाऊ शकतो. त्यामुळे खर्च कमी होऊन शेतीतील नफ्यात वाढ होऊ शकते, असे विश्लेषकांना वाटते.
टोळधाड रोखण्यासाठी यशस्वी प्रयोग
गेल्या काही महिन्यांत भारतातील विविध ठिकाणी टोळधाड आली होती. यावेळी केंद्र आणि राज्यांनी वेगाने समन्वय करून ड्रोनचा वापर औषध फवारणीसाठी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक वाचविण्यात यश आले. अशाप्रकारे ड्रोनचा वापर अनेक क्षेत्रांत केला जाऊ शकतो. अन्नपुरवठा किंवा औषधपुरवठा क्षेत्रात ड्रोनचा वापर होणार आहे. या तंत्रज्ञानाचा शेतीला फायदा होण्याची गरज असल्याचे मत परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.