नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने योग्य प्रकारे वाटचाल केली आहे. त्यामुळे विकास दर वेगाने पूर्वपदावर येत आहे. मात्र अजूनही ग्राहकाकडून मागणी वाढलेली नाही. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक वाढत नाही. या आघाडीवर सर्वांनी मिळून समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांना चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शहरातील आणि खेड्यातील गरिबांना बऱ्याच थेट सवलती देण्यात आलेल्या आहेत. आगामी काळातही त्यांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर त्यांच्याकडून विविध उत्पादनांची मागणी वाढण्यास मदत होणार आहे. पहिल्या तिमाहीच्या विकास दराची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. ही आकडेवारी सकारात्मक असणार आहे.
या वर्षाचा विकास दर दहा टक्क्याच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र अजूनही खासगी क्षेत्रातून भांडवली गुंतवणूक करण्यात येत नाही. कारण पुरेशी मागणी ग्राहकाकडून येत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून मागणी आल्यानंतर खाजगी क्षेत्र आपल्या उत्पादनाचे विस्तारीकरण करेल असे पत्रकात नमूद करण्यात आले.
करोनाच्या काळामध्ये केंद्रसरकारने लघु उद्योगांना आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला बरीच मदत केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. आगामी काळातही लघुउद्योगांना काही प्रमाणात मदत करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. करोनाच्या काळातही बॅंकांची परिस्थिती चांगली होती. आगामी काळात या बॅंका विविध उद्योगांना भांडवलाचा पुरवठा करू शकतील असे सांगण्यात आले