पुणे – जगातील आर्थिक महासत्ता असणारा आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा आणि भक्ती मार्गातून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांवर करून मूल्याध्याष्ठित पिढी घडविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त गडकरी यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी “मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, अभय क्षीरसागर, सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे उपस्थित होते.
शिक्षणावर होणाऱ्या खर्चातून देशातील पिढी संस्कारीत करून त्यातून व्यक्ति निर्माण करण्याचे कार्य शिक्षण संस्था करीत असतात. देशाचा विकास करायचा असल्यास शिक्षण क्षेत्रात कुठल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे, याबाबतचा जीवन दृष्टिकोन बाळगून भविष्याच्या निर्मितीसाठी देशाला ऍप्रोप्रिएट व्हिजन देण्याचे कार्य महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने केले आहे, असेही गडकरी यांनी म्हणाले.
शिक्षक आपल्या परीने विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतात. त्याद्वारे दुसऱ्यांना घडवू शकू असे व्यक्तिमत्व निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थी गुगल, विकिपीडियाद्वारे माहिती मिळवत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यापेक्षा एक पायरी पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी कायम शिकत राहिले पाहिजे, असे गोखले यांनी सांगितले.
सूत्रसंचालन वर्षा तोरडमल यांनी केले. आभार डॉ. भरत व्हनकटे यांनी मानले.