दखल : महेश कोळी
तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या बाबतीत स्वित्झर्लंडचा जगात पहिला क्रमांक आहे. या यादीत भारताचा क्रमांक 66 वा आहे. निर्मितीच्या बाबतीत चीन आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर, स्वावलंबी भारत मोहिमेच्या यशस्वितेसाठी तंत्रज्ञानातील संशोधनावर भारताला भर द्यावा लागेल. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण निर्माते नव्हे तर जगातील सर्वांत मोठे ग्राहक बनलो आहोत. हे चित्र बदलायला हवे.
कोविड-19 च्या संसर्गकाळात आकस्मिकरीत्या काही संधीही निर्माण झाल्या आहेत आणि त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासाठी स्वावलंबी बनण्याच्या मार्गात त्यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करण्यावर भर दिला असून, “लोकल’ उत्पादनांच्या “व्होकल’ प्रचारावर भर दिला आहे.
यासंदर्भात आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताच्या स्वावलंबनाकडे पाहतो, तेव्हा असे दिसते की, आपल्या कामकाजात अवलंबिण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत बऱ्याच अंशी आपण परदेशी कंपन्यांशी जोडले गेलो आहोत. फेसबुकवरील लाइक, शेअर, चॅटसमवेत गूगल, व्हॉट्सऍप, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आदींचे आपल्याला जणू व्यसन लागले आहे. या साधनांविना आपली अगणित कामे अपूर्ण राहतील.
टू-जीपासून फोर-जीपर्यंत किंवा प्रायोगिक तत्त्वावर फाइव्ह-जीच्या टेलिकॉम तंत्रज्ञानावर आधारित इंटरनेटचा वेग असो किंवा गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, यू-ट्यूब, स्मार्टफोन असोत किंवा ई-कॉमर्स आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात धुमाकूळ घालत असलेले ऍमेझॉन, अलीबाबा, नेटफ्लिक्स, डिज्नी यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म असोत, जगात या माध्यमांचा सर्वाधिक वापर करणारे आपण भारतीयच आहोत. दुसरीकडे, अशा तंत्रज्ञानांच्या एकाधिकार निर्मितीच्या क्षेत्रात आपले स्थान नगण्य आहे. वास्तविक, याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम, ई-लर्निंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यासह ई-कोर्ट, ई-गव्हर्नन्स, सेफ्टी सर्व्हिलन्स आणि वैद्यकीय क्षेत्रात यश प्राप्त करता आले आहे. आरोग्य सेतूसारख्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ऍपच्या निर्मितीचा पायाही याच तंत्रज्ञानामुळे आपण रचू शकलो.
आगामी काळात तंत्रज्ञान आणखी शक्तिशाली बनणार आहे. अनेक नवे पैलू तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात सुविधा वाढून श्रम कमी होण्याची शक्यता आहे. स्वावलंबी बनण्याच्या मार्गात आणि रोजगार-व्यवसायाच्या व्यवस्थेत होणारा बदल उंबरठ्याशी आहे. सध्याच्या काळाची गरज पाहता पंतप्रधानांचे आवाहन खूप महत्त्वाचे आहे. अर्थात, अनेक सवालही त्यामुळे निर्माण होतात.
स्वावलंबी भारताचे आवाहन स्वीकारण्यास आपण किती सक्षम आणि तयार आहोत? आपल्याकडील प्रतिभावंतांची क्षमता किती आहे? तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संशोधने आणि नवे चमत्कार आपल्याकडे का घडत नाहीत? आपल्याकडील प्रतिभावंत जगभरातील तंत्रज्ञानाच्या विकासात व्यस्त आहेत, तर मग आपल्याकडे काय कमी आहे म्हणून आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतरांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणारे बनलो आहोत? तंत्रज्ञानाकडे भारतीय दृष्टिकोनातून कधी पाहिले जाणार आणि अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य यांसारख्या समस्या तंत्रज्ञानाशी कधी जोडल्या जाणार?
भारतात 11 मे 1999 रोजी पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला, त्याच्या दोन वर्षे आधी गुगलची स्थापना झाली होती. 4 फेब्रुवारी 2004 रोजी फेसबुकचे आणि 24 फेब्रुवारी 2009 रोजी व्हॉट्सऍपचे आगमन झाले. या संपूर्ण कालावधीत आपण भारताने घेतलेल्या अणुचाचणीच्या आठवणी काढून केवळ औपचारिक स्वरूपात तंत्रज्ञान दिवस साजरा केला. पाहता-पाहता तंत्रज्ञानाची दुनिया वेगाने बदलत गेली. नव्वदीच्या दशकात 56 केबीपीपासून सुरू झालेले आणि टेलिफोनद्वारे प्राप्त होणारे इंटरनेट कनेक्शन 2000 मध्ये मुक्त होऊन ब्रॉडबॅंडशी जोडले गेले. आता आपण ऑप्टिकल फायबरसोबत 300 एमबीपीएस एवढ्या प्रचंड गतिमान इंटरनेटची चर्चा करीत आहोत. आपण आपले स्वतःचे असे कोणतेही ठळक अस्तित्व निर्माण करू शकलो नाही, हे खूपच दुर्दैवी आहे. आपण निर्माते कधीच झालो नाही, तर कायम ग्राहक बनून राहिलो.
इस्रो आणि डीआरडीओसारख्या संस्थांनी आपल्याला अवकाशात नेऊन पोहोचविले. अमेरिकेसह इतर अनेक देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याचे कौशल्य आपण प्राप्त केले. त्याव्यतिरिक्त चांद्रयान आणि मंगळयान अशा यशस्वी मोहिमा आपण केल्या; परंतु तरीही तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहातील बहुतांश शोधांवर आपण भारताच्या नावाचे शिक्कामोर्तब करू शकलो नाही. आपल्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक 500 पेक्षा अधिक संस्था कार्यरत आहेत. एक हजाराहून अधिक संशोधन केंद्रे आणि विकास प्रयोगशाळा आहेत. देशातील सर्व संशोधनात्मक आणि तंत्रज्ञानविषयक घडामोडींचा समन्वय साधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ही शासनाची प्रशासकीय यंत्रणाही कार्यरत आहे.
तंत्रज्ञानाचा विकास आणि डिजिटल संशोधनाच्या शर्यतीत भारत मागे पडल्याच्या पार्श्वभूमीवर स्टीव्ह जॉब्ज यांच्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. जॉब्ज यांच्या म्हणण्यानुसार, कोण नेतृत्व करेल आणि कोण पिछाडीवर राहील, याचा निर्णय नवीन संशोधनांमधून लागतो. या पार्श्वभूमीवर, नवीन संशोधनात भारत ना नेतृत्व करीत आहे, ना फारसा मागे पडला आहे. संशोधनाच्या बाबतीत अमेरिका तर निर्मितीच्या बाबतीत चीन आघाडीवर आहे. “मेक इन इंडिया’च्या एका कार्यक्रमात नोबेल पुरस्कार विजेते डेव्हिड यांनी म्हटले होते की, भारताने दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये. संशोधनात आणि निर्मितीत स्वतः पुढे आले पाहिजे.