कोल्हापूर : प्लास्टिक हे मोठी समस्या सध्या भेडसावत आहे. प्लास्टिक शिवाय आपले आयुष्य अपूर्ण झाले आहे. आणि प्लास्टिकला दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे आणि यात सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण नरके यांनी व्यक्त केली.
प्लास्टीव्हिजन इंडिया 2020 हे भव्य प्रदर्शन येत्या जानेवारीत 16 ते 20 तारखे दरम्यान मुंबईत होणार आहे. याचा प्रचार-प्रसाराचा शुभारंभ कोल्हापुरातून करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्लास्टिक गोळा करून त्याचे व्यवस्थापन करणे अवघड गोष्ट आहे. ही जबाबदारी शासनाबरोबरच लोकसहभागातून पार पडणे गरजेचे आहे. प्लास्टिक व्यवस्थापनासाठी तीन आर यात रेड्युस म्हणजे कमी करणे, रिबेट म्हणजे आहे त्याचा योग्य वापर आणि रियुज म्हणजे पुनर्वापर यावर भर दिला पाहिजे, असे नरके यांनी सांगितले.
सकाळपासून रात्रीपर्यंत प्लास्टिक हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. प्लास्टिक बंदी हा काही त्यावर उपाय नाही. अमेरिकेत फक्त 9 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. पण पर्यायाने भारतात 60 टक्के होतो तरी प्लास्टिक ही गंभीर समस्या बनली. कारण लोक ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करत नाहीत. असे केल्यास प्रशासनालाही प्लास्टिक पुनर्वापर करणे सोपे जाईल.आणि ही समस्या दूर होऊ शकते, असे रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले यांनी सांगितले.
यावेळी अवनी संस्थेच्या प्रमुख व समाज सेविका अनुराधा भोसले यांच्या अवनी संस्थेमार्फत 300 टन सुका कचरा गोळा करण्यात आला यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ललित गांधी, प्रताप पुराणिक, नॅशनल प्लास्टिव्हिजनचे को.चेअरमन ऋतुराज गुप्ता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रकांत तूरकिया यांनी तर सूत्रसंचालन ताज मुल्लानि यांनी केले. आभार किशोर संपत यांनी मानले.