“पुण्याला जेव्हा जाग येते’ पथनाट्याच्या माध्यमातून संदेश
आजारी पडलेल्या नदीवर करण्यात आले उपचार
पुणे – “आजारी पडलेल्या नदीला वाचविण्यासाठी तिच्या जवळच्यांकडून विविध घरगुती उपाय केले जातात; परंतु नदी बरी होत नाही. त्याचवेळी एक डॉ. जीवित नदीला बोलावले जाते. नदीची योग्य तपासणी केल्यानंतर डॉक्टर सल्ला देतात, “समस्या नदीमध्ये नाही, तर तिच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये आहे. तुम्ही बदला नदी नक्कीच बरी होईल.’
त्यानंतर डॉ. प्रत्येकाला पर्यावरणपूरक जीवनशैलीचा मंत्र देतात आणि हळूहळू नदीची प्रकृती सुधारू लागते. नदीसंवर्धनासाठी जीवनशैलीतील बदलाची आवश्यकतेचा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.
नदीसंवर्धनासाठी काम करणाऱ्या जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी बाणेर येथील सोमेश्वर मंदिर येथे “पुण्याला जेव्हा जाग येते’ हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून विकासकामांमुळे नदीची खुंटलेली वाढ, तिची घुसमट, प्रदूषण आणि दुरावस्था यावर प्रकाश टाकण्यात आला.
तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी रसायन युक्त साधनांचा वापर थांबवून पर्यावरणपूरक वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा, सीमेंट- कॉंक्रिटीकरणाला रोखले पाहिजे, असा संदेशही देण्यात आला. या पथनाट्याचे लेखन संस्थेचे सदस्य सागर कुलकर्णी यांनी केले तर माधुरी शेवळे, स्वाती कुलकर्णी, मंदार शिंदे, अभिलाषा वर्मा आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमास नागरिकांनीही प्रतिसाद दिला.