प्रा. डॉ. जगदीश आवटे
मानवी जीवनाच्या इतिहासातील विविध काळात, जगाच्या विविध प्रांतांत अनेकदा जीवघेण्या साथी येऊन गेल्या आहेत. या साथींमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याचे ऐतिहासिक संदर्भांवरून कळून येते. ध्यानीमनी नसताना आलेल्या या साथींवर त्या त्या काळात कोणतेही परिणामकारक, प्रभावी औषधोपचार किंवा लस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी ही ठरलेलीच असायची.
अज्ञात, अदृश्य अशा दुष्ट शक्तींमुळे, देव किंवा देवी कोपल्यामुळे, तथाकथित मानवी पापांचा भार पेलवेनासा झाल्यामुळे अशा जीवघेण्या साथी उद्भवत असल्याचा समज प्राचीन काळापासून भारतात दृढ होता.
युरोपातही यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नव्हती. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असे वैद्यकशास्त्र विकसित झाले नसल्यामुळे अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन अशा साथींवर थातूरमातूर आणि परिणामशून्य उपाय केले जायचे. साथीच्या वैशिष्ट्यांनुसार एका विशिष्ट ठरावीक टप्प्यानंतर ह्या साथी आपोआप ओसरत असायच्या. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊन जायची. मरणारी आणि वाचणारी सर्वसामान्य माणसे दैवगतीचा भाग समजून जीवनाची पुढील वाटचाल करीत राहायचे.
देवी, पोलिओ, प्लेग यासारख्या काही साथींमुळे संबंध जगभर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याचे आणि त्यामुळे मानवी जगात त्या त्या प्रमाणात उलथापालथ झाल्याचे ऐतिहासिक संदर्भांवरून आपल्याला कळून येते.
चारशे-पाचशे वर्षांपूर्वी युरोपात वैज्ञानिक क्रांतीचा उदय झाल्यानंतर मात्र अशा साथींचा पद्धतशीर अभ्यास करणाऱ्या संशोधकांची परंपरा निर्माण होऊ लागली. इंग्लंडमधील डॉ. एडवर्ड जेन्नर हे या परंपरेचे आद्य उद्गाते मानायला हवे. 14 मे 1796 रोजी त्यांनी देवीच्या आजारावर पहिली यशस्वी चाचणी केली आणि जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील ती एक क्रांतिकारी घटना ठरली. त्यांनी शोधलेल्या लसीमुळे जगभरात देवीच्या जीवघेण्या साथीमुळे मरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली.
त्यानंतरच्या संशोधकांनी ह्या लसीमध्ये उत्तरोत्तर सुधारणा करीत लसीची परिणामकारकता वाढवत नेली. सुमारे दोनशे वर्षांनी, 1980 च्या मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने देवी हा रोग जगातून पूर्णपणे नाहीसा झाल्याचे जाहीर केले, त्याचे खरे श्रेय जाते ते डॉ. एडवर्ड जेन्नर यांना. जेन्नर यांच्या संशोधनामुळे “लसीकरण’ ह्या नवीनच शब्दाची भर शब्दकोशात पडली.
जेन्नर यांनी लसीकरण ह्या केवळ संकल्पनेचीच जगाला देणगी दिली, असे नव्हे तर त्यांच्यामुळे देवीसारख्या जीवघेण्या साथींवर लसींची निर्मिती करणाऱ्या संशोधकांची एक परंपराच युरोपात निर्माण झाली. आयुर्वेद चिकित्सा वगळता आपल्या देशात वैद्यकीय विश्वात अशी एखादी आधुनिक परंपरा का निर्माण झाली नसेल, किंबहुना असा एखादा संशोधक का उदयाला आला नसेल; याचे उत्तर शोधणे क्रमप्राप्त ठरते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीयांमध्ये असलेला दस्तऐवजीकरणाच्या सवयीचा अभाव, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
ह्या दस्तऐवजीकरणाच्या अभावाचा फार मोठा फटका करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या जाणवत आहे. राज्यात आणि देशात सुमारे बारा वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूच्या साथीने धुमाकूळ घातला होता. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2009 ह्या चार महिन्यांच्या काळात देशात आलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीने त्या वेळीसुद्धा आजच्याप्रमाणेच शाळा, महाविद्यालये काही काळापुरती बंद करण्यात आली होती. त्या सुमारास एकट्या महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त बळी गेले होते.
टॅमीफ्लू ह्या औषधांमुळे त्यावेळी स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आली खरी; परंतु त्या साथीची लक्षणे, आगमन, प्रसार, नियंत्रण कसे केले गेले, याबाबतची नेमकी माहिती शासकीय पातळीवर सध्या उपलब्धच नाही, कारण त्या माहितीचे त्यावेळी दस्तऐवजीकरणच केले गेले नाही. हे दस्तऐवजीकरण आज उपलब्ध असते तर करोना साथीविरोधात सध्या आणखी पद्धतशीरपणे लढा देता आला असता. त्यामुळेच भविष्यात अशा प्रकारची साथ आली तर तिचे प्रभावी नियंत्रण करता यावे, आवश्यक त्या उपाययोजना करता याव्यात, यासाठी आता करोनाबाबतचे डॉक्युमेंटेशन अर्थात दस्तऐवजीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याचे राज्य शासनाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी जून 2020 च्या दुसऱ्या पंधरवड्यात जाहीर केले आहे.
मात्र, ह्या दस्तऐवजीकरणाची जबाबदारी “एमएसआरडीसी’च्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांवर का सोपवली असेल, याचा उलगडा मात्र होत नाही. ह्या महामंडळाकडे त्यांची स्वतःची अशी प्रशासकीय स्वरूपाची मूळ कामे असणारच आहेत. त्यामुळे दप्तरदिरंगाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही दप्तरदिरंगाई पुढची एखादी साथ येईपर्यंत न टिकली म्हणजे मिळवली! तरी शासनाने प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकादमी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील सांख्यिकी तज्ज्ञांना व विश्लेषकांना, अभ्यासपूर्ण अहवाल बनवणाऱ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या संस्थांना आणि वृत्तपत्रीय समूहातील जाणकारांना सहभागी करून घ्यावे. ह्या दस्तऐवजीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यामुळे हे दस्तऐवजीकरणाचे बिकट व किचकट मात्र बहुपयोगी काम अधिकाधिक उत्तमरीत्या पूर्णत्वास जाईल.
करोनाचे उगमस्थान, उगमकाळ, कारणे, लक्षणे, प्रसार, मनुष्यहानी, करोनामुळे झालेला दूरगामी परिणाम तसेच साथ निर्मूलनासाठी जागतिक पातळीवर होत असलेले प्रयत्न, देशपातळीवर सरकारच्या माध्यमातून केले जात असलेले उपाय; याबाबत प्रसारमाध्यमांमधून दररोज भरपूर माहिती प्रसिद्ध होत आहे.
पर्यायी औषधोपचार व लसीबाबतचे संशोधन, साथीमुळे झालेले स्थलांतर तसेच एकूणच मानवी जीवनात घडून येत असलेले स्थित्यंतर वगैरे बाबतची साद्यंत माहिती वृत्तपत्रीय माध्यमांमधून रकानेच्या रकाने भरून येत आहे.
ह्या माहितीचे पुनर्निरीक्षण, पृथक्करण, विश्लेषण करून सुस्पष्ट, ससंदर्भ दस्तऐवजीकरण करण्याचे काम हे केवळ शासकीय पातळीवर करायचे ठरवले तर ते वेळखाऊ, सरकारी छापाचे आणि क्लिष्ट ठरेल. यासंदर्भातील अभ्यासगटाने भारताव्यतिरिक्त इतर देशांतील दस्तऐवजीकरणाच्या कामांचीही माहिती घ्यावी. असे जर झाले तर करोनासंदर्भातील हे डॉक्युमेंटेशन म्हणजेच दस्तऐवजीकरण भविष्यकाळातील साथ निर्मूलनासाठी पथदर्शक ठरेल, एवढे मात्र नक्की.